उरण : वेळेपूर्वीच सुरू झालेल्या पावसामुळे उरणच्या भातशेतीला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात मे महिन्यात करण्यात येणाऱ्या भाताच्या सुक्या पेरण्या वाया जाण्याची तसेच भात पीक लांबण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.मान्सूनची सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या मशागतीला लागला आहे. याच काळात शेतकरी भाताच्या सुक्या पेरण्या करतात. तप्त झालेली जमीन आणि त्यात पेरणी केलेले धान्य या उष्णत्यामुळे आणि त्यानंतर आलेल्या जोरदार पावसामुळे भाताचा अंकुर फुटण्यास मदत होते. मात्र यावेळी अगोदरच पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी पेरणी वाया जाण्याची तसेच पिकाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे येथील शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी उरणच्या अनेक भागात आजही भात शेती केली जाते. जवळपास २ हजार ४०० हेक्टर जमीनीवर भात पीक घेतले जात आहे. मात्र अवकाळी,अति पाऊस,नापिकी शेती आदी संकटे वारंवार येऊनही शेतकरी शेती करीत आहेत. मात्र या वर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळीच्या सरी कोसळू लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. हवामान विभागाने मे महिन्याच्या अखेर पर्यंत अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यात भर पडली आहे. दरम्यान, वेळेपूर्वीच पावसाळा सुरू झाल्याने भात शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पेरण्याही थांबल्या आहेत. अशी माहिती उरणच्या तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहणार आहे. या पावसामुळे भात पिकासाठी आवश्यक असलेली जमिनीची नैसर्गिक उष्णता नष्ट होणार आहे. त्यामुळे भात बियाणे रुजून उगवण्यासाठी उशीर लागणार आहे. परिणामी २५ ते ३० टक्के पीक कमी होणार आहे. तसेच बियाणेही अधिकचे लागण्याची भीती आहे. प्रफुल्ल खारपाटील, शेतकरी