नवी मुंबई: पहिल्याच पावसात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पूर्णपणे गाळात गेला आहे. एपीएमसीतील कांदा-बटाटा, मसाला, धान्य, भाजीपाला आणि फळ बाजार या सर्वच विभागांत पावसाने मोठे नुकसान केले आहे. विशेषतः मसाला मार्केट परिसरात तर पाऊस गेल्यानंतर ४८ तास उलटूनही पाणी तुंबलेच आहे.दरवर्षी सेसच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं योगदान देणाऱ्या व्यापाऱ्यांना आजही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. आमच्याच पैशातून जिथे नालेच नाहीत तिथे गटारसफाई केली जाते आणि साचलेलं पाणी आमच्या मालात शिरतं. जबाबदारी कुणाची? असा सवाल करत व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. आता बैठका नकोत उपाय करा असे व्यापाऱ्यांकडून प्रशासनाला सांगितले जात आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि बाजारात होणारी कोट्यवधींची उलाढाल.असे चित्र वरवर जरी दिसत असले तरी मूलभूत सुविधांपासून ही बाजार पेठ अद्यापही वंचित असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुंबई एपीएमसीमध्ये सध्या गटार नव्हे, तर कारभार सडल्याची दुर्गंधी दरवळत आहे. पहिल्या पावसातच बाजार कोसळला, तर पुढचे तीन महिने व्यापाऱ्यांचे हाल काय असतील, याची कल्पनाही नको! असा चिंतेचा सूर बाजार घटकांकडून ऐकायला मिळत आहे.

साफसफाई की हाथसफाई?

“दरवर्षी टेंडर निघतात, कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण प्रत्यक्षात नाले साफ होतात कुठे?” असा सवाल उपस्थित करत व्यापाऱ्यांनी प्रशासनावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले. “जिथे नालेच नाहीत तिथे सफाई दाखवली जाते, ही नालेसफाई नाही, निधीची हातसफाई आहे!” अशी संतप्त प्रतिक्रिया बाजार घटकांनी दिली. मसाला मार्केटमधील मुख्य नाला साफ न करता थेट नवीन गटार रचण्याचा अजब प्रयोग प्रशासनाने केला, मात्र ती गटारयंत्रणा इतकी निकृष्ट आहे की पावसाचे पाणी अजूनही अडकलंच आहे.

संचालक मंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पाच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या संचालक मंडळाने नालेसफाईच्या कामांमध्ये गंभीर अनियमितता केल्याचा आरोपदेखील व्यापाऱ्यांनी केला आहे. जिथे गटारच नाही तिथे सफाईचे दरपत्रक, आणि जिथे गटार आहे तिथे पाणी साचलेलं! असा संताप व्यक्त करत व्यापाऱ्यांनी मंडळाच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवलं आहे. रस्ते उकरले, पावसात सगळं वाहून गेलं. नियोजनशून्य कामामुळे आमचं नुकसानच होत आहे असंही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

‘तुंबई’ची जबाबदारी कोणाची?

एपीएमसीचे सभापती प्रभू पाटील यांनी पाऊस वेळेआधी आला म्हणून तुंबई झाली, असं विधान केलं असलं तरी व्यापाऱ्यांचा रोष हवामानावर नाही, तर पालिकेच्या कारभारावर आहे. पणनमंत्री आणि सचिव १०० दिवसांचं नियोजन करतात, पण पावसात सगळं ‘बुडतं’. बाजारात पाणी नव्हे, भ्रष्टाचार साचलाय! अशी घणाघाती टीका व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुसळधार पावसामुळे पाणी तुंबलेल्या ठिकाणी मोटर लावून ते काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य नियोजन केले जाईल.- डॉ. पी. एल. खंडागळे, सचिव, एपीएमसी