नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) मसाला मार्केटमध्ये भिंतीलगत उभारण्यात येत असलेल्या नव्या अनधिकृत प्रवेशद्वारामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ई आणि एफ विंगच्या बाजूला, आधीच अस्तित्वात असलेल्या डी विंगच्या जावक प्रवेशद्वारापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर हे नवीन प्रवेशद्वार उभारले जात असून, या कृतीमुळे वाहतूक कोंडीचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या मसाला मार्केटमध्ये चार अधिकृत प्रवेशद्वारे कार्यरत आहेत. असे असतानाही नव्या प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी नवी मुंबई महापालिका किंवा वाहतूक विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. बाजार परिसरातील व्यापाऱ्यांनी या बांधकामाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
‘या नव्या प्रवेशद्वारामुळे फळ आणि भाजीपाला मार्केटसमोरील मुख्य रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी होणार आहे. आधीच या मार्गावर वाहतुकीचा ताण आहे,’ असा इशारा स्थानिक व्यापाऱ्यांनी दिला आहे. शिवाय, कल्याण, डोंबिवली, ठाणे या मार्गावर जाणाऱ्या वाहनांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. या प्रवेशद्वारासाठी ‘१२(१)’ अंतर्गत एपीएमसी प्रशासनाने मंजुरी घेतल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ही मंजुरी कोणतीही स्थानिक परवानगी न घेता देण्यात आली असल्याचा आरोप आहे.
संबंधित ठिकाणी आधीच असलेल्या भिंतीला तडा देऊन बांधकाम केल्याचा मुद्दा चर्चेत आहे. तुर्भे विभागाचे अधिकारी सागर मोरे यांना याबाबत विचारले असता, एपीएमसी अभियंता सतीश देशमुख यांनी सदर भिंत पावसामुळे कोसळल्याची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही बाबही संशयाच्या भोवऱ्यात आहे, कारण व्यापाऱ्यांच्या मते ही भिंत मुद्दाम तोडण्यात आली.
या प्रवेशद्वारासाठी किरकोळ व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांची वसुली करण्यात आल्याचे आरोप आहेत. मसाला मार्केटसारख्या संवेदनशील परिसरात परवानगीशिवाय प्रवेशद्वार उभारणे म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक बाब आहे. तसेच, वाहतूक नियंत्रणाच्या नियमांचीही पायमल्ली झाल्याचा आरोप होतो आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी बाजार घटकांकडून करण्यात येत आहे.
हा आमच्या मालकीचा हक्काचा बाजार आहे. त्यामुळे इतर संस्थांची परवानगी घेण्याची गरज नाही. संचालक मंडळाचा ठराव असून १२(१) मंजुरीप्रमाणे हे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. – डॉ. पी.एल. खंडागळे, सचिव, एपीएमसी