नवी मुंबई : यंदा मोरबे धरण परिसरात पूर्वमोसमी पाऊस चांगला झाला. नैऋत्य मोसमी पावसाचे आगमनही लवकर झाले. बुधवारी धरणात एका दिवसात तब्बल १९१ मिमी पाऊस कोसळला. परिणामी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पुढील ११३ दिवस नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करता येईल एवढा जलसाठा धरणात आहे. याच दिवशी गेल्यावर्षी फक्त १८ मिमी पावसाची नोंद झाली होती.
स्वत:च्या मालकीचे धरण असलेल्या व जलसंपन्न शहर संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबईला महापालिकेच्या मोरबे धरणात मागील ३ वर्षांतील सर्वाधिक जलसाठा यंदा शिल्लक आहे. धरणात सद्यस्थितीला ४४.४६ टक्के जलसाठा शिल्लक असून पुढील ११३ दिवस हे पाणी शहराची तहान भागवणार आहे.
पावसाला चांगली सुरवात झाली असली तरीही नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे. मोरबे धरण गेल्यावर्षी २८ ऑगस्ट २०२४ ला १०० टक्के भरले होते. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. दरम्यान, महामुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दिवसेंदिवस अतिशय सुनियोजित असलेल्या शहराचा दर्जा आणखी वाढत जाऊ लागला आहे. परंतु नवी मुंबई महापालिकेच्या लोकसंख्येच्या मानाने धरणातून अधिक पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे पालिकेने पाणी उपशावरही नियंत्रण ठेवण्याची खूप आवश्यकता आहे.
धरणातील पाणीस्थिती
शिल्लक पाणीसाठा – ४४.४६ टक्के
धरण पातळी – ७५.३७ मीटर
सुरळीत पाणीपुरवठा कधीपर्यंत – १० ऑक्टोंबर २०२५
गेल्यावर्षी मोरबे धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले होते. यंदाही धरण परिसरात चांगला पाऊस पडत आहे. गेल्या ३ वर्षांच्या तुलनेत धरणात अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सूनच्या पावसालाही सुरुवात झाली असून मोरबे धरण परिसरात चांगला पाऊस पडू लागला आहे. यंदाही धरण १०० टक्के भरेल अशी आशा आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता, मोरबे प्रकल्प