नवी मुंबई : अमली पदार्थाच्या अवैध व्यवसायात अग्रभागी असलेल्या एक हजारांहून अधिक आफ्रिकन वंशाच्या नागरिकांना मायदेशी धाडण्याची कारवाई करणाऱ्या नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी नशामुक्तीचा नारा देत ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाची सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ होताच पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी यापुढे कुणीही व्यक्ती नशेला बळी पडू नये यासाठी विशेष मोहिमांची आखणी केली जात असल्याचे यावेळी जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित नवी मुंबई, वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, प्रख्यात अभिनेता आणि ‘नशामुक्त नवी मुंबई’ या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहम, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, संजय येनपुरे महाविद्यालयीन विद्यार्थी, नशामुक्तीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> Torres Ponzi Scam: ‘असा’ झाला टोरेस कंपनीचा घोटाळा; मालक विदेशात फरार, अनिश्चिततेत गुंतवणूकदार!

काय आहे अभियान ?

– गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईत अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीचे जाळे मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात मोठया प्रमाणावर वास्तव्य करणाऱ्या आफ्रिकन देशातील नागरिकांकडून अमली पदार्थाचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी यासंबंधी मोठ्या प्रमाणावर मोहीमा हाती घेऊन ही साखळी मोडून काढण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे, असे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी स्पष्ट केले.

– ‘नशा मुक्त नवी मुंबई’ अभियानात पुढील काही दिवस शाळा, महाविद्यालय विद्यार्थी तसेच नागरिकांना सजग करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातील.

– नवी मुंबई शहर पूर्णपणे अमली पदार्थ मुक्त व्हावे यासाठी पोलीस विभाग मनापासून काम करत आहे, नागरिकांनी याकामी सहकार्य करावे. आपल्याला कोणतीही माहिती असेल तर तातडीने आम्हाला ८८२८११२११२ हेल्पलाईनवर कळवा. आम्ही कारवाई करु, असे आवाहनही भारंबे यांनी केले.

हेही वाचा >>> बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा; पार्किंगची अट शिथिल करण्याचा महापालिकेचा निर्णय

भारत ही लढाई जिंकेल : मुख्यमंत्री

देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचे दुष्कर्म करीत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग राहा, सैनिक म्हणून पुढे या. ही देखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे कॅनडासारखा देश सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडला आहे. मात्र भारत सजग राहून नशेविरोधातील ही लढाई जिंकू शकतो, असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१७५० आरोपींना अटक

गेल्या वर्षभरात नवी मुंबईत अंमली पदार्थ बाळगणे, सेवन करणे, खरेदी-विक्री करणे या प्रकरणात एक हजार १३३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे यावेळी भारंबे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात १७५० आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील १११ आफ्रिकन नागरिक आहेत. एकूण ५६ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.