गुरुवारी रात्री आठच्या सुमारास नवी मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा कोणताही अंदाज वर्तवला नसताना अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. नवी मुंबईत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. ठाण्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत.

कोणत्याही पूर्वतयारीसह घराबाहेर पडलेल्या नागरिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून घरी परतण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असून वाहन चालकांची पुरती धांदल उडाली आहे. याशिवाय छोटे दुकानदार, व्यावसायिकांसह नोकरवर्गालाही घरी परतण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करावा लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याणमध्येही विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. अचानक पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यावर नागरिकांची तारांबळ उडाली असून अनेक ठिकाणी एक तासापासून बत्ती गूल झाली आहे. ऐन दिवाळीत अचानक पाऊस कोसळल्याने रस्त्यावरती दुकानदाराचे मोठे नुकसान झालं आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.