मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात सध्या बटाट्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कांद्या पाठोपाठ बटाट्याच्या दरांमध्येही लक्षणीय घसरण झाली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि पंजाबमधून मोठ्या प्रमाणात माल दाखल झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अपेक्षित दर मिळत नाहीत, ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

बाजार समितीच्या अद्ययावत दरानुसार, उत्तम प्रतीचा व्हीव्हीआयपी बटाटा सध्या १७ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे, तर कोल्ड स्टोअरेजमधील त्याच प्रकारचा माल १४ ते १६ रुपये प्रति किलो दराने विक्रीस येत आहे. त्याच वेळी, जंग लागलेल्या लालझाली बटाट्याचा दर ११ ते १३ रुपये प्रति किलो दरम्यान असून, हलक्या डागाळलेल्या मालाचे दर केवळ ५ ते १० रुपये प्रति किलो इतके घसरले आहेत.

उत्तर प्रदेशमधील ३०२ हायब्रिड बटाट्याचा दर देखील केवळ ५ ते १० रुपये प्रति किलो आहे. गुजरातमधील एलआर लाल वेफर ग्रेड बटाटा सध्या १८ ते २० रुपये प्रति किलो दराने विक्रीस असून, त्याच प्रकाराचा दुसऱ्या दर्ज्याचा बटाटा १५ ते १७ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. मध्य प्रदेशातून आलेल्या बटाट्याचेही दर साधारण असेच असून, काही व्हीव्हीआयपी दर्जाचा माल १९ ते २१ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.

या बाजारातील सध्याच्या स्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. बटाट्याचा साठा जास्त असून मागणी तुलनेने कमी असल्याने, दर आणखी घसरू शकतात, अशी भीती व्यापाऱ्यांनीही व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली असली, तरी उत्तर भारतात पाऊस सुरू होण्यास वेळ आहे. मुंबई एपीएमसीत येणारा माल हा मुख्यतः मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात आणि पंजाब या भागातून येतो. महाराष्ट्रात हा बटाटा येईपर्यंत पावसामुळे तयार झालेल्या दमट वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यामुळे बाजारात सध्या डागाळलेला बटाटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी, चांगला माल कमी आणि डागी माल जास्त असल्याने बटाट्याच्या मागणीतही घट झाली असून दर घसरले आहेत. – मनोहर तोतलानी, कांदा-बटाटा व्यापारी, एपीएमसी