नवी मुंबई : सीवूड्स येथील एनआरआय संकुलामागील खाडी हा फ्लेमिंगोंचा अधिवास असल्याने या अधिवासाला धोका निर्माण करणारा खाडी किनाऱ्यालगतचा रस्ता बंद करण्याची स्पष्ट शिफारस करण्यात आली. यासंदर्भात राज्य सरकारच्या आदेशावरून नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने तीन डिसेंबर रोजी एनआरआयनजीकच्या खाडी परिसराची पाहणी करून दिलेल्या अहवालात ही शिफारस केली.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका पथकाने ३ डिसेंबर रोजी तलाव परिसराला भेट दिली होती. त्यांनी सादर केलेल्या अहवालात खाडीकिनारी बांधण्यात आलेला रस्ता काढून टाकावा असे सुचवण्यात आले आहे. या बांधकामामुळे खारफुटी आणि पाणथळ जागांना धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा…विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस

याशिवाय जेट्टीबाबत समस्यांचा आढावा आणि स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया पाहणी पथकाचे मंडळ निरीक्षक सुरेश रोकडे यांनी दिली. फ्लेमिंगोंच्या मृत्यूनंतर तत्कालीन वनमंत्री यांनी समिती नेमली होती.

पाणथळ जागा कोरडी झाल्याचा दावा

दरवर्षी हिवाळ्यात लाखोंच्या संख्येने सीवूड्स खाडी परिसरात फ्लेमिंगो पक्षी विणीच्या काळात येतात. मात्र गेल्या काही वर्षांत फ्लेमिंगोंची संख्या कमालीची रोडावली आहे. खाडी किनाऱ्यावर बांधलेला सुमारे दीड किलोमीटरचा डांबरी रस्ता आणि जेट्टीमुळेच ही संख्या रोडावल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. तसेच या दोन्ही कारणांनी भरतीवेळी समुद्राचे पाणी येऊन नैसर्गिकरीत्या तयार झालेली पाणथळ जागा कोरडी झाली आहे. त्यामुळे फ्लेमिंगोंना मिळणारे खाद्या आणि वातावरण दोन्हींचा नाश झाला, असा दावा पर्यावरणप्रेमी संस्थांनी अनेकदा केला होता.ॉ

हेही वाचा…प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीवूड्स खाडीकिनारा परिसरातील फ्लेमिंगो अस्तित्व धोक्यात आले आहे. खारफुटीच्या ५० मीटरच्या परिघात कोणत्याही बांधकामास बंदी असा नियम असताना त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. शहराच्या पाणथळ प्रदेशांचे संवर्धन करणेदेखील महत्त्वाचे आहे. कारण ते नैसर्गिक पूर-विरोधी यंत्रणा म्हणून काम करतात, मासेमारी व्यवसायपूरक वातावरण निर्माण करत पर्यावरणीय समतोल राखणे गरजेचे आहे. बी एन कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाऊंडेशन