नवी मुंबई :शेतकऱ्याच्या घामाची किंमत घाऊक बाजारात काही पैशांत ठरते, तर तीच भाजी शहरात ग्राहकाला चारपट अधिक दराने मिळते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)च्या भाजीपाला बाजारात सध्या सुरू असलेल्या दुहेरी दरपद्धतीमुळे शेतकरी आणि ग्राहक दोघेही आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. अडत्यांचे संगनमत, भाडेतत्त्वावर देण्यात आलेले गाळे, आणि अनधिकृत विक्रेत्यांच्या शिरकावामुळे संपूर्ण व्यापार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई एपीएमसीमध्ये दररोज ५०० ते ७०० मालवाहू गाड्यांमधून भाजीपाला येतो. हा माल डी विंगमध्ये किरकोळ दराने, तर ए आणि ई विंगमध्ये घाऊक दराने विकला जातो. त्यामुळे एकाच भाजीला एका बाजूला १०–४० रुपये प्रतिकिलो दर असतो, तर दुसऱ्या बाजूला ३०–१०० रुपये दर. यामुळे शेतकऱ्याला कमी मोबदला आणि ग्राहकाला महाग भाजी असा दुहेरी फटका बसतो आहे. बाजारात जवळपास ६० टक्के व्यापाऱ्यांनी आपले गाळे भाड्याने देऊन बोगस अडत्यांना जागा दिली आहे. एका गाळ्यात चार-पाच अडते दिवसाला प्रत्येकी ५००–७०० रुपयांच्या बदल्यात व्यापार करतात. यामुळे अधिकृत व्यापाऱ्यांना गाळे मिळत नाहीत, शेतकऱ्याला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद होतो, आणि ग्राहक महागाईने त्रस्त होतो.
राज्याचे पणन मंत्री शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदे, साठवणूक व निर्यातीसाठी धोरणं जाहीर करत असले तरी एपीएमसीतील वस्तुस्थिती याच्या विपरीत आहे. बाजार समिती प्रशासन, संचालक मंडळ आणि सभापती यांच्यावर कारवाई न केल्याचा आरोप होत आहे.
दरपत्रकातील वास्तव – बुधवार, २८ मे
भाजीपाला ए आणि इ विंग मधले दर (₹/किलो) डी विंग मधले दर (₹/किलो)
टोमॅटो ₹१७ ₹५०–₹६०
कोथिंबीर (जुडी) ₹२० ₹४०–₹५०
फ्लॉवर ₹३०–₹४० ₹३५–₹४०
पालक (जुडी) ₹१० ₹२५–₹३०
मेथी (जुडी) ₹२० ₹४०–₹५०
ढोबळी मिरची ₹४३ ₹५०–₹६०
फ्रेंच बीन्स ₹८०–₹९० ₹९०–₹१००
बाजारपेठेतील सध्याची स्थिती पाहता, शेतकरी आणि ग्राहक दोघांच्याही हितासाठी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. बाजार समिती प्रशासनाने पारदर्शकता, अधिकृत नोंदणी आणि दरनियंत्रण सुनिश्चित केल्यासच ही दुहेरी दरनीती थांबू शकेल. अन्यथा, शेतकऱ्याचा घाम आणि ग्राहकाच्या खिशाला अशाच प्रकारे उतरती कळा लागणार.
“भाजीपाला बाजारात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा विक्रेत्यांवर बाजार समितीकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची पिळवणूक होत असल्यास याची चौकशी करून संबंधितांवर योग्यती कारवाई करण्यात येईल.”- डॉ. पी.एल.खंडागळे, सचिव, एपीएमसी