फ्रान्समधील बोडरे (Bordeaux) शहरातील द्राक्षांवर या ताम्रयुक्त कवकनाशक मिश्रणाचा प्रथम वापर सुरू झाला. यामुळे या मिश्रणाला बोडरेमिश्रण हे नाव पडले. रस्त्याच्या कडेला असलेल्या द्राक्षांवर प्रथम या मिश्रणाचा वापर सुरू केला गेला. ते विषारी आहे असे समजून वाटसरू सुरुवातीस अशी द्राक्षे खात नसत. फ्रान्समध्ये द्राक्षांवर केवडा रोग पडू लागला होता, त्या वेळेस बोडरेमिश्रण फवारलेली द्राक्षे मात्र या रोगापासून सुरक्षित राहिली. त्यामुळे नंतर बोडरेमिश्रणाचा वापर सर्रास सुरू झाला आणि तो अजूनही चालू आहे.
  बोडरेमिश्रणात २.३ किलोग्रॅम कळीचा चुना, २.३ किलोग्रॅम मोरचूद आणि २२५ लिटर पाणी असे घटक असतात. पिकांच्या अवस्थेप्रमाणे ते सौम्य किंवा तीव्र करतात.
 बोडरेमिश्रण करण्यासाठी धातूची भांडी वापरत नाहीत. मातीच्या हंडय़ात किंवा लाकडी पिंपातपाणी घेऊन त्यात मोरचूद विरघळवतात. दुसऱ्या एका लाकडी पिंपात किंवा मातीच्या हंडय़ात पाणी घेऊन चुनकळीचे द्रावण तयार करतात. त्यानंतर मोरचुदाचे द्रावण चुनकळीच्या द्रावणात हळूहळू ओतत व ढवळत मिसळून एकजीव करतात किंवा ही दोन्ही द्रावणे तिसऱ्या लाकडी पिंपात एका वेळेस एकत्र ओततात.
  बोडरेमिश्रण तयार झाल्यावर ते लगेच त्याच दिवशी फवारावे. फवारण्यापूर्वी ते उदासीन आहे की नाही हे तपासावे. हे मिश्रण अतिशय स्वस्त आणि निर्धोक असते. तंतुभुरी (द्राक्षे), पानांवरील डाग (टोमॅटो, पपई, पानवेल व हळद), बटाटय़ावरील करपा, भुईमुगावरील टिक्का, रोपांची मर, लिंबावरील खैरा, सुपारीची फळगळ या रोगांवर या मिश्रणाचा चांगला उपयोग होतो. सफरचंदावर या मिश्रणाचा काही वेळेला वाईट परिणाम दिसून येतो.
 मेसन या शास्त्रज्ञाने १८८७ साली चुन्याची कळी न मिळाल्याने त्याऐवजी धुण्याचा सोडा वापरून हे मिश्रण तयार केले. आर्यलडमध्ये हे मिश्रण बटाटय़ावर वापरले गेले. त्याला सोडा बोडरे असे नाव पडले. हे मिश्रण करण्याची पद्धत बोडरेमिश्रणासारखीच असून त्यासाठी मोरचूद १.८ किलोग्रॅम, धुण्याचा सोडा २.३ किलोग्रॅम आणि पाणी २२५ लिटर वापरतात. बोडरेमिश्रणाप्रमाणे या मिश्रणाचा फळांवर डाग पडणे, कोवळी पाने करपणे असे दुष्परिणाम होत नाहीत.
– अशोक जोशी (पुणे)    
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..      चंदन सिंग
१९६८ ते १९७० ही वर्षे एका अर्थाने माझ्या आयुष्यात भुर्रकन उडाली. सकाळी आठ वाजता मी टिळक रुग्णालयात जात असे कधी डबा तर कधी घरी जेवत असे. दुपारी एक ते तीन, मी राज्यसरकारच्या विमा योजनेचा अर्ध वेळ शल्यचिकित्सक होतो. तीन ते साडेचार मी दादर स्थानकाच्या पश्चिम रेल्वेच्या शेवटच्या फलाटावर सरकारने मान्य केलेल्या योजनेअंतर्गत पुरुषांची नसबंदी पार्सल ऑफिसमध्ये करीत असे. पाच वाजता मी ट्रेन पकडून अंधेरीच्या माझ्या दवाखान्यात जात असे. तिथून सात वाजता निघून दादरच्या दवाखान्यात येत असे. तिथे नऊ वाजत असत; पण त्या वयात मित्रांचा गराडा ऐवढा होता की, आठवडय़ातून निदान दोन-तीन पाटर्य़ा ठरलेल्या होत्या. टिळक रुग्णालयातले माझे प्राध्यापकपद मानद होते आणि मानधन होते दोनशे पन्नास रुपये.
मला दोन मुले होती संसार उभा ठाकला होता तेव्हा खासगी व्यवसाय अपरिहार्य होता. त्या खासगी केसेस वरच्या सगळ्या धबडग्यात बसवायचो एका अर्थाने एखाद्या तरुण पुरुषाला कृतार्थ वाटावे असेच जीवन होते. माझे नाव होत होते. मी शहाणा नव्हतो, पण चतुर होतो. त्याची फळे मिळत होती. नसबंदीच्या कार्यक्रमात एका रुग्णाचे बजेट असे तीन रुपये. मला एका नसबंदीचे पाच रुपये मिळत जो उमेदवार आणत असे त्याला दहा आणि जो नसबंदी करून घेत असे त्याला पंधरा रुपये मिळत.
हा कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम अमानवी आहे, असा एक मतप्रवाह त्या वेळी होता, पण तो पार दाबला गेला. त्या नसबंदी केंद्रात चंदनसिंग नावाचा एक अनभिषिक्त चालक होता. साफसफाई, फॉर्म भरणे मग त्याचे पैसे घेऊन येणे हे सगळे काम त्याने अंगावर घेतले. तो नसबंदीसाठी माणसेही आणत असे. पंधरा दिवसांनी तो हिशेब करीत असे एक दिवस चंदनसिंग आलाच नाही. मग बेपत्ता झाला. माझे पैसे घेऊन पळून गेला होता. पैसे गेल्याचे फारसे वाईट वाटले नाही, पण हा असा वागला याचे मात्र वाईट वाटले. त्यानंतर अनेक वर्षांनी माझ्या दादरच्या दवाखान्यात अचानक चार अरब पेशंट आले. त्या काळात अरब पेशंट म्हणजे एक घबाड होते. माझ्याकडे ते क्वचितच येत. मी सगळ्यांना तपासले आणि लगेचच चंदनसिंग अवतरला आणि त्याने एका पाकिटात घालून मला चार हजार रुपये दिले.
मला म्हणाला, तुमचे पूर्वीचे १५०० रुपये आणि या चौघांचे अडीच हजार. मग पाया पडला आणि निघून गेला. या प्रसंगाने मी हतबुद्ध झालो. एकंदरच माझ्या आयुष्याचा विचार करू लागलो. पोटा-पाण्यासाठी मी एक हमालीचे जनावर झालो आहे, असा विचार मनात येत असेच. तो आता आणखीनच बळावला.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : नागीण : आयुर्वेदीय उपचार
आग होत असल्यास थंड उपचार, चंदन लेप, पुन:पुन्हा पातळ लेप, लेप सुकू न देणे. खाज, पू असल्यास पोटिसाने शेकून पाहा. खाज, ठणक्यावर गरम पाणी+मिठाने व्रण धुऊन दिशा ठरवावी.
पित्तप्रधान नागीण- प्रवाळ, कामदुधा व चंदनादि प्र. ३ गोळय़ा दोन वेळा खाव्यात. उपळसरी चूर्ण सकाळी १ चमचा घ्यावे. लघवी गरम होत असल्यास रसायनचूर्ण दुपारी एक चमचा घ्यावे. अंगाचा दाह होत असल्यास व आर्थिक स्थिती चांगली असल्यास मौक्तिक भस्म ५० मि. ग्रॅ. दोन वेळा घ्यावे. दशांगलेप गार पाण्यात कालवून त्याचा पातळ लेप, आग होत असलेल्या फोडास सतत ओला लावावा. चंदन गंध पुन:पुन्हा लावावे. जखम भरून येण्याकरिता रात्री झोपताना एलादि तेल किंवा शतधौतघृत लावावे.
कफप्रधान नागीण- पू, दडसपणा, खाज, ठणका अशी लक्षणे असलेल्या फोडांना टाकणखार चार भाग, कणीक एक भाग व पाणी यांच्या साहाय्याने केलेल्या पोटिसाने शेकणे. त्यानंतर स्वच्छ फोडावर एलादि तेल लावावे. दडसपणा असलेल्यावर पोटीस रात्रभर बांधून ठेवावे. सूज कमी करणाऱ्या नेहमीच्या लेपगोळीचा दाट, गरम लेप रात्री लावावा. आरोग्यवर्धिनी, त्रिफळागुग्गुळ, प्रवाळ, कामदुधा प्र. ३ गोळय़ा २ वेळा घ्याव्यात. नागीण बरी झाल्यावर व्रणामुळे पडलेले काळे डाग जावयास, दीर्घकाळ शतधौतघृत सकाळ-सायंकाळ लावावे. शरीरात मुरलेली विषरूप उष्णता जाण्याकरिता रसायन किंवा उपळसरीचूर्ण सकाळी नियमितपणे घ्यावे.
रुग्णालयीन उपचार- पित्तप्रधान : रोगी बलवान असल्यास, मलप्रवृत्ती साफ नसल्यास गुलाबकळी, बाहवामगज, बाळहिरडा, सोनामुखी असा काढा घ्यावा. कफप्रधान : रोगी बलवान असल्यास ज्येष्ठमध, गेळफळाचा काढा वमनाकरिता विधिपूर्वक घ्यावा. रक्तप्रधान : रक्ताचे वजन फाजील प्रमाणात वाढले असल्यास डोळय़ांतील लाली, अंगाची आग ही लक्षणे असल्यास तज्ज्ञांच्या देखरेखीखाली रक्तमोक्षण करावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २७ एप्रिल
१९३६ > संशोधक, समीक्षक सुरेश रामकृष्ण चुनेकर यांचा जन्म. मराठी संशोधन पत्रिकेचे संपादन त्यांनी काही काळ केले. साहित्य अकादमीसाठी ‘माधव ज्यूलिअन’ परिचयग्रंथ लिहिला. ‘सूचींची सूची’, ‘सहा साहित्यकार’, ‘अंतरंग’ हे त्यांचे अन्य ग्रंथ. १९७६ > कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ‘आरती प्रभू’ यांचे निधन. ‘जोगवा’, ‘नक्षत्रांचे देणे’ हे त्यांचे काव्यसंग्रह मराठी कवितेला नवजीवन देणारे ठरले. सनई, राखी पाखरू, चाफा आणि देवाची आई असे कथासंग्रह, चानी, कोंडुरा, रात्र काळी घागर काळी, अजगर आदी नऊ कादंबऱ्या  आणि ‘एक शून्य बाजीराव’सह नऊ अनुवादित नाटके त्यांनी लिहिली. राज्य शासनाची आठ पारितोषिके  वेळोवेळी मिळालेल्या या कवीने प्रस्थापित स्वस्थपणा कधीही स्वीकारला नाही. पुढे जया दडकर यांनी याच अस्वस्थतेचा मागोवा घेणारे ‘चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात’ हे पुस्तक लिहिले.
१९९२ > समीक्षक व कथा-कादंबरीकार विश्वनाथ वामन पत्की यांचे निधन. नऊ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांना गुरुतुल्य असणाऱ्या ना. सी. फडके यांचा कार्यवेध ‘युगप्रवर्तक फडके’मधून घेतला, तसेच सी. डी. देशमुखांच्या आत्मचरित्राचा अनुवाद केला.
– संजय वझरेकर