दुधामधील पोषक घटक (दुग्धशर्करा, प्रथिने, खनिजघटक आणि जीवनसत्त्व) आबालवृद्धांना अत्यंत उपयुक्त आहेत. तथापि दुधातील पोषक घटक आणि आपल्याकडील उष्ण हवामान अशा स्थितीत सूक्ष्म जिवाणूंची वाढ अत्यंत झपाटय़ाने होते. आपल्या आरोग्यास धोकादायक क्षय, घसादुखी, ब्रुसेल्ला, आंत्रदाह या रोगांना कारणीभूत असणारे जिवाणू आजारग्रस्त गायी, म्हशींच्या दुधातून निर्माण होतात. अस्वच्छ गोठा, गुरे, दूध काढणारी व्यक्ती आणि दूध साठवण्याची अस्वच्छ भांडी यांद्वारे दुधात सूक्ष्म जिवाणूंचा प्रादुर्भाव होतो. परिणामी दूध नासते. उत्पादकाचे मोठय़ा प्रमाणात आíथक नुकसान होते. काही सूक्ष्म जिवाणू दुधात असताना विषद्रव्ये तयार करतात. अशा दुधाच्या सेवनाने विषबाधा होण्याच्या घटना वारंवार आढळतात. सूक्ष्म जिवाणू असलेल्या दुधापासून दर्जेदार टिकाऊ पदार्थ (चीज, पनीर) तयार होत नाहीत. सध्या दुधातील सूक्ष्म जिवाणूंच्या संख्येनुसार दर्जा ठरवण्याची पद्धत विकसित होत आहे.
दुधातील जिवाणूंमुळे होणारे रोग टाळण्यास आणि दूध नासणे टाळण्यास घरगुती पातळीवर दूध उतू जाईपर्यंत गरम करणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर दूध शीतपेटीत (रेफ्रिजरेटरमध्ये) ठेवून वापरता येईल. दूधशाळेत मोठय़ा प्रमाणावर दूधहाताळणी करावी लागते. अशा ठिकाणी विविध पद्धतींचा वापर होतो. सामान्यपणे दूध यंत्राद्वारे ७२ अंश सेल्सिअस तापमानास १५ सेकंद गरम करून त्वरित ५ अंश सेल्सिअस तापमानास थंड केले जाते. त्यामुळे दूध र्निजतुक होते. या पद्धतीस पाश्चरायझेशन म्हणतात. सामान्य तापमानास दीर्घ काळ दूध टिकवायचे असेल तर ते १३५ ते १५० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत अर्धा सेकंद गरम केले जाते. त्यानंतर ते र्निजतुक वातावरणात विशिष्ट प्रतीच्या डब्यात भरले जाते. अर्थात, अशा दुधाची किंमत जास्त असते. पाश्चरायझेशन करून प्लॅस्टिक पिशवीत भरलेल्या दुधात तसेच हवाबंद डब्यात भरलेल्या दुधात पोषक घटकांची फारशी हानी होत नाही. त्यामुळे असे दूध वापरणे योग्य ठरते. भारतीय मानक संस्थेने विविध प्रकारच्या दुधातील आणि दुग्धजन्य पदार्थातील जिवाणूंच्या संख्येबाबत निर्देश (मानक) ठरवले आहेत.

जे देखे रवी..       मेघदूत
एक होता नोकर. त्याने आपल्या मालकाला फसवले तेव्हा त्याला हद्दपार करण्यात आले आणि त्याची बायको गावातच राहिली आणि हा विरहाने बेजार झाला. इतका की तो खंगला आणि त्याच्या हातातले कडे नकळत गळून पडले. हद्दपारीची जागा एका डोंगराजवळ होती. त्या डोंगराच्या माथ्याला भिडणारा एक ढग त्याला दिसला, जसा काही एखादा हत्ती तटबंदी फोडतो आहे तसा. या ढगाकरवी आपल्या बायकोला निरोप पाठवण्याची कल्पना त्याला सुचली.
तेव्हा म्हणतो कसा- ‘मी तरी किती वेडा. एखादी ढगासारखी निर्जीव गोष्ट निरोप कसा पोहोचवणार? पण विरही माणसाचे डोके ठिकाणावर नसते हेच खरे.’ या प्रेमाच्या गोष्टीत तो माणूस ढगाला म्हणतो, ‘एकदा ही शेजारी निजली होती. मग दचकून उठली आणि हसुमुसु रडू लागली तेव्हा म्हणाली ,माझ्या स्वप्नात तू दुसरीबरोबर प्रणयक्रीडा केलीस अशी गोष्ट घडली.’ तो ढगाला म्हणतो, ‘मी हिला घट्ट आलिंगन देण्यासाठी आकाशात बाहू पसरतो तेव्हा ते दृश्य बघून आजूबाजूच्या देवतांच्या डोळ्यांतून अश्रूंची रांग लागते, जणू हळुवारपणे वृक्षांची पाने गळत आहेत.’ तो विरही नवरा ढगाला म्हणतो, ‘तू पोचशील तेव्हा माझी आठवण करत करत हिला झोप लागली असेस. तिला गरजून दचकवून उठवू नकोस. तुझ्याबरोबरच्या वाऱ्याची हळूच फुंकर घाल. मग तुझ्यातले पाणी हळूच शिंपड आणि मगच वीज चमकव म्हणजे मग ती डोळे कळ्या कशा उमलतात तशा तऱ्हेने उघडेल. मग ती भानावर आली की माझ्या प्रेमाचा व्याकूळ निरोप तिला दे.’ हे वर्णन आहे कालिदासाच्या ‘मेघदूत’ या काव्यातले.
कोण म्हणतो पुरुषांना प्रेम करता येत नाही? कालिदास जरा महाच. तो ‘ऋतुसंहार’ नाटकात लिहितो- कडक उन्हाळ्यात सुंदर स्त्रिया मऊ रेशमी कपडे घालतात. नितंबांवर माळा गुंडाळतात. स्तनांवर चंदन लावतात आणि फुलांनी ते सजवतात. उटणे लावून आपले केस सुवासिक करतात आणि (मग) आपल्या प्रियकराच्या मनातला दाह शांत करतात. ‘अरे कालिदासा, कुठे गेल्या या तुझ्या काळातल्या ललना?’

रविन मायदेव थत्ते –    rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस: सिकलसेल अ‍ॅनिमिया : दुर्धर बालविकार
‘सिकल’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे गवत कापण्याचा विळा किंवा कोयता. सिकल सेल अ‍ॅनिमिया हा लाल रक्तपेशींमधील दोषांमुळे होणारा आजार आहे. निरोगी माणसाच्या लाल रक्तपेशींचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केल्यास त्यांचा आकार गोलाकार दिसतो. पण सिकलसेल रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्यासारख्या आकाराच्या, वेडय़ावाकडय़ा दिसतात. या दोषाला ‘सिकलिंग गुणधर्म’ असे म्हणतात. निरोगी माणसाच्या आणि सिकलसेल रुग्णाच्या लाल रक्तपेशींचा तुलनात्मक अभ्यास केल्याशिवाय शास्त्रज्ञांना ‘हिमोग्लोबिन’ प्रथिनात दोष आढळून आला. दोष आढळलेल्या हिमोग्लोबिनला ‘सिकलिंग हिमोग्लोबिन’ असे नाव देण्यात आले. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते आणि त्या लवकर फुटतात. त्यामुळे रक्त कमी होते. याच अवस्थेला ‘अ‍ॅनिमिया’ म्हटले जाते. त्यामुळे या आजाराला ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ असे नाव पडले.
हा आनुवंशिक विकार असल्याने आई-वडील दोघेही सिकलसेलग्रस्त; त्यांनी एकमेकांशी विवाह टाळावा. कोणत्याही सूक्ष्म जंतू/विषाणूमुळे किंवा पोषक आहार न घेतल्यामुळे हा आजार होत नाही.या आजाराचे रुग्ण जगभर सापडतात. पण आफ्रिका, सौदी अरेबिया व भारतात त्याचे प्रमाण अधिक आहे. देशात मध्य भारतात याचे रुग्ण अधिक सापडतात.  महाराष्ट्रातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर जिल्ह्य़ांत या विकाराचे किमान २.५ लाख रुग्ण आहेत.  प्रारंभी शारीरिक थकवा, सांधेदुखी, पांडुता, पिवळसर नेत्र, पांथरीची वाढ अशी लक्षणे दिसतात. ऋतुबदलामध्ये हा आजार तीव्र होतो. माझेकडे आलेल्या डझनभर रुग्णांपैकी एकाच रुग्णाने नेटाने रिकाम्यापोटी तपासणी, नियमित पथ्यपाणी २ वर्षे अखंड चालू ठेवले. जीभ, यकृत यास सूज, रक्ततपासणी यांच्या आधारावर; भोजनानंतर फलत्रिकादि काढा; सकाळ-सायं. चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादि, शृंग, लाक्षादिगुग्गुळ, आरोग्यवर्धिनी अशा औषधी योजनेमुळे रोगी रोगमुक्त झाल्याचा अनुभव आहे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजचे महाराष्ट्रसारस्वत: १७ ऑगस्ट
१९०४ >  ग्रंथसूचीकार म्हणून स्वतचा ठसा उमटवणारे शंकर गणेश दाते यांचा जन्म. दुर्मीळ ग्रंथसंग्रहाच्या ध्यासातून त्यांनी सूचीकार्य सुरू केले. पुढे ‘१८०० ते १९३७’ आणि ‘१९३८ ते ५०’ असे त्यांनी केलेल्या ग्रंथसूचींचे दोन खंड ‘दाते ग्रंथ सूची’ या नावाने प्रकाशित झाले. प्रकाशित ग्रंथांची माहिती एकत्रित करण्याच्या त्यांच्या महत्कार्याची दखल घेऊन ‘राष्ट्रीय ग्रंथसूची’चे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते, पण ते आकारास येण्यापूर्वी (१९६४) त्यांचे निधन झाले.
१९०८>  ‘कुणा आवडतो मोर पिसाऱ्याचा’ या कवितेचे कवी दत्तप्रसन्न नारायण कारखानीस यांचा जन्म. त्यांच्या कवितांचे ‘क्षितिजावर’ व ‘काव्यविलास’ असे दोन संग्रह निघाले, अनेक कविता मराठी क्रमिक पुस्तकांमध्ये समाविष्ट झाल्या.
१९४८ > व्यासंगी लेखक आणि अभ्यासक शेषराव मोरे यांचा जन्म. रूढ समजांपेक्षा निराळी मते, अभ्यासूपणे आणि इतिहासाचे दाखले देऊन मांडणारे, अशी त्यांची ख्याती आहे.  ‘१८५७ चा जिहाद’, सावरकरांचा बुद्धिवाद, काश्मीर : एक शापित नंदनवन, डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण, मुस्लिम मनाचा शोध, ‘अप्रिय, पण..’ ही त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांची काही नावे.
संजय वझरेकर