पालघर : शिरगाव गावात खेकडा, दुर्बिणीच्या आकाराचे शंखाचे प्रकार तसेच प्रवाळ यांचे जीवाश्म सापडल्याने पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीला असणारा खडकाळ प्रदेश हा पश्चिम घाटाचा पाण्यात बुडलेला भाग असल्याची पुष्टी मिळत आहे. याबाबत विविध मासे समुद्रामध्ये उत्क्रांती होऊन झालेल्या बदलांबाबत अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्यात एडवण, दातीवरे, कोरे, शिरगांव, मुरबे, नांदगाव, वरोर, वाढवण, नरपड, चिखले, बोर्डी इत्यादी ठिकाणी खडकाळ समुद्र किनारे आहेत. या खडकांची निर्मिती पश्चिम घाटांच्या सोबत जवळपास १०-१५ दशलक्ष वर्ष पूर्वी झाली असण्याची शक्यता आहे. ज्वालामुखी मधून निघालेला लाव्हारस थंड झाल्यामुळे खडकाळ समुद्र तळ निर्माण झाला असे या विषयातील तज्ञांशी मत आहे.

लाव्हारस थंड होत असताना काही कवचधारी प्राणी या लाव्हारसाच्या आत अडकल्याने कालांतराने प्राण्यांचे अवशेष नष्ट झाले परंतु त्यांनी दगडांवर मात्र त्यांचा ठसा उमटल्याचे अलीकडे सापडलेल्या काही जीवाश्म नमुन्यात दिसून आले आहे. त्याच प्रकारे असेच काही जीवाश्म पावसाळ्यात लाटांच्या सोबत किनाऱ्यावर पसरल्याचे देखील दिसून आले आहे.

शिरगांव येथील खडकाळ किनाऱ्याचा अभ्यास करत असताना सिंधू सह्याद्री फाऊंडेशनच्या भूषण भोईर यांना काही जीवाश्म सापडले असून त्यामध्ये दगडात उमटलेल्या खेकड्याच्या पाठीचे जीवाश्म यांचा समावेश आहे. हे जीवाश्म मून क्रॅब (कुर्ली) या खेकड्याच्या पूर्वजांच्या कुळातील असावे अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दुर्बिणी प्रमाणे असणारा शंखाचा प्रकार अर्थात टेलिस्कोपीयम प्रजातीच्या प्रकारातील जीवाश्म देखील शिरगाव किनारी सापडले आहेत. हे जीवाश्म अती उष्ण लाव्हारस आणि खनिजांच्या संपर्कात आल्याने शंख नष्ट झाला असून त्याची जागा स्फटिक रुपी दगडाने घेतली आहे. यामुळे हे जीवाश्म लाखों वर्ष जतन होऊ शकले. त्याच बरोबरीने ब्रेन कोरल प्रजाती पैकी एखाद्या कोरल प्रजातीचे असावे असे आणखीन एक जीवाश्म मिळाले असल्याची माहिती या क्षेत्रातील अभ्यासक भूषण भोईर यांनी लोकसत्ता ला दिली.

सखोल अभ्यासाची गरज

पालघर व डहाणू तालुक्यातील समुद्रकिनारा जैवविविधतेने नटलेला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाळ व इतर किनारा लगतच्या प्राण्यांचे जीवाश्म सापडत आहेत. यापैकी आढळलेल्या काही जीवाश्मचा आकार उत्क्रांती होऊन सद्यस्थितीत असणाऱ्या काही प्राण्यांशी साम्य आढळून आले असून याबाबत सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. जीवाश्म मध्ये मिळणारे ठसे याबाबत पुरावे तेज असून संबंधित जीवाश्म वस्तूंची कार्बन डेटिंग करून त्यांचे आयुर्मान निश्चित करणे आवश्यक झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम किनारपट्टीची जिल्ह्यातील जैवविविधता

पालघर आणि डहाणू परिसरातील बहुतांश सागरतळ हा अग्निजन्य खडकापासून तयार झालेले आहेत. हा भाग कधीकाळी सक्रिय ज्वालामुखीच्या प्रभाव क्षेत्रात असतील असे सागरतळ सर्व सामान्य सागर तलांच्या तुलनेत थोडे गरम असतात. त्यामुळे बहुतांशी खोल समुद्रातील मत्स्य प्रजातीच्या प्रजननासाठी सुयोग्य तापमान इथे मिळत असावे असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे लाखो वर्ष पूर्वी पासून हा भूभाग मत्स्य प्रजातींचे नंदनवन म्हणून ठरला असावा अशी शक्यता असून पुढे ज्वालामुखी थंड झाल्यानंतर तयार झालेल्या खडकाळ समुद्रतलामुळे विविध प्रकारच्या प्रवाळ प्रजातींची वाढ होण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली. अलीकडेच वाढवण (डहाणू) परिसरात काही खोल समुद्रातील प्रवलांच्या प्रजाती अभ्यासकांना मिळाल्या असून यावर सखोल अभ्यास करण्यात येत आहे. शासकीय पातळीवर देखील परिसराचा अभ्यास व्हायला हवा असे मत भूषण भोईर यांनी व्यक्त केले.