पालघर: पालघर जिल्हा मुख्यालयाकडे येणाऱ्या मार्गांवर पालघर शहर तसेच लगतच्या गावांमध्ये झालेले अतिक्रमण तातडीने दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जून महिन्यात दिले होते. आदेश देऊन सहा महिने उलटले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण दूर करण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही.

जिल्हा मुख्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यावरील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख रस्त्यांवर असणाऱ्या अतिक्रमणाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा, भरत गोगावले म्हणतात, “मुख्यमंत्री…”

शासनाने नेमून दिलेल्या नियमांचे पालन करत रस्त्याच्या वर्गवारीनुसार रस्त्यावरील बांधकाम रेषेचे पालन व्हावे तसेच रस्त्यापासून ठराविक अंतरावरील जागा मोकळी ठेवण्याबाबत शासनाचे अभिप्रेत असताना त्याचे अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालघर रेल्वे स्थानकातून येताना तसेच बोईसर मार्गे अथवा मनोर मार्गे येताना रस्त्याकडेला झालेले अतिक्रमण कायम असल्याचे दिसून आले आहेत.

पालघर रेल्वे स्टेशन परिसरात १०० मीटर अंतर ना फेरीवाला क्षेत्र असणे अपेक्षित असताना या नियमांचे तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचे या बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले होते. याबाबत पालघर नगर परिषदेने काही वेळा कारवाई केली असली तरीही कालांतराने परिस्थिती पूर्ववत झाल्याने ही कारवाई दिखाव्यापूर्ती झाल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. फेरीवाले, दुचाकी पार्किंग तसेच हातगाडी वाल्यांमुळे पालघर रेल्वे स्टेशन गजबजलेला असून त्या ठिकाणी जिल्हा मुख्यालयाकडे जाण्याकरिता मार्ग काढणे नागरिकांना अजूनही कठीण होत आहे.

माहीम ग्रामपंचायत हद्दीमध्ये रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्या ठिकाणी असलेल्या हॉटेल व्यवसायिकांमुळे रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात पार्किंग केले जात आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून अनेकांचा या अपघातांमध्ये गंभीर जखमी अथवा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा – “त्या पार्टीत गिरीश महाजनांसह पाच भाजपा नेते”, व्हिडीओ शेअर करत सुषमा अंधारेंचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

पावसाळ्याचा आधार घेत स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याविरुद्ध कारवाई केली नसल्याची सबब पुढे केली जात आहे. पावसाळा संपून दोन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अतिक्रमण दूर करण्याबाबत अजून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता पालघर येथील वाहतूक समस्या व रस्त्याकडेला झालेल्या अतिक्रमणाबाबत लवकरच संबंधित विभागाशी बैठक घेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, असे सांगण्यात आले.