पालघर : डीएफसीसी प्रकल्प, देहर्जे प्रकल्प, खडखड धरण प्रकल्प, लेंडी प्रकल्प, मुंबई वडोदरा महामार्ग, मुंबई अहमदाबाद महामार्ग (एन एच) तसेच एमआरव्हीसी व बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासंदर्भात आमदार राजेंद्र गावित यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित अधिकारी तसेच प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिक यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.
३१ मे रोजी संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये सर्व प्रकल्पाशी संबंधित मुद्यांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू विशाल खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार अपुर्वा बसूर, भूसंपादन समन्वय उपजिल्हाधिकारी महेश सागर, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण, उपविभागीय अधिकारी वाडा संदिप चव्हाण, प्रभारी उपविभागीय अधिकारी पालघर रविंद्र राजपूत, जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख, नरेंद्र पाटील, देहर्जे व लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिनेश शेवाळे, अमोल फुंदे, अधिक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प, सहा. संचालक, नगररचना भाग्यश्री धवळसंक तसेच डीएफसीसी प्रकल्पाचे श्री. रॉय व एमआरव्हीसी व बुलेट ट्रेनचे अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाशी संबंधित असलेले शेतकरी, नागरिक यांचे प्रश्न चर्चेला घेऊन ते सोडविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याबाबत सर्व संबंधित अधिकारी यांना डॉ. इंदुराणी जाखड यांनी निर्देश दिले.
आमदार राजेंद्र गावित यांनी लेंडी प्रकल्प, देहर्जे प्रकल्प, मुंबई वडोदरा महामार्ग प्रकल्प येथील बाधितांच्या प्रश्नांची चर्चा घडवून त्यातील काही त्रुटी सर्व संबंधित अधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्या व त्यावर जिल्हाधिकारी यांनी यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले. शासन स्तरावरील काही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन आमदार गावित यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांनी डीएफसीसी व एमआरव्हीसी यांच्यामार्फत सुरु असलेल्या रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी तसेच भुयारीमार्गामध्ये पावसामुळे पाणी साचते अशा ठिकाणी पाण्याचा निचरा होईल याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. बोईसर काटकरपाडा येथे एमआरव्हीसीमार्फत सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी व पंचाळी, केळवे रोड, रोठे तसेच डहाणू येथील कसारा व जुन्नरपाडा या भुयारीमार्गात कुठेही पाणी तुंबणार नाही याची दक्षता एमआरव्हीसी व डीएफसीसी यांनी घ्यावी तसेच याबाबत पुन्हा तक्रार येणार नाही असे संबंधित विभागाला निर्देश दिले.
मुंबई अहमदाबाद महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग ४८) वर घोडबंदर पासून पालघरपर्यंत व्हाईट टॅपिंगचे काम सुरु असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत तसेच या महामार्गावर पावसाळ्यात पाणी साचून मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर एनएचआयचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी कामाचा दर्जा सुधारणेबाबत तसेच अपघात टाळणेकामी योग्य त्या उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.