पालघर: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून यावर ठोस उपाययोजना करावी असे स्पष्ट निर्देश आमदार विलास तरे यांनी महामार्ग वाहतूक पोलीस यांना बैठकीत दिले आहे.
यावेळी आमदार तरे म्हणाले की, मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ हा महामार्ग मुंबई व गुजरात राज्यांना जोडणारा नसून, तो महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यावसायिक व वैद्यकीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः पालघर जिल्ह्यातील बोईसर – तारापूर औद्योगिक क्षेत्र, वसई – विरार महानगर क्षेत्र, तसेच तेथील विविध कारखाने, आयात-निर्यात व्यवसाय, रुग्णालये व शैक्षणिक संस्था या सर्वांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी या महामार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
मात्र, मागील आठवड्याभरापासून या महामार्गावर वारंवार आणि तीव्र स्वरूपाची वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रमाणे गंभीर परिणाम होत आहेत: वेळेवर रुग्णालयात पोहोचण्यास अडथळा निर्माण होत असून, यामुळे गंभीर आजारी रुग्णांचे प्राणही धोक्यात येऊ शकतात, बोईसर – तारापूर एमआयडीसीमधील निर्यात योग्य मालाच्या वाहतुकीस विलंब होत असून, याचा परिणाम औद्योगिक गतीवर होत आहे, वेळेत कामावर पोहोचता न आल्याने अनेकांना दंडाचा, कापाचा किंवा गैरहजेरीचा सामना करावा लागत आहे, अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत सोडले गेले असून, खड्ड्यांमुळे अपघात व वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे, या त्रासांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांचा संयम सुटत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर, वाहतूक कोंडी समस्येवर तातडीने उपाययोजना करा, वाहतूक नियोजनात सुधारणा करा, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून नागरिकांना दिलासा मिळवून देणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, ही बैठक बोलावण्यात आली आहे, असे बोईसर चे आमदार विलास तरे यांनी सांगितले.
या बैठकीस आमदार विलास तरे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, प्राधिकरण अभियंता आर. राय, संतोष सैनिस, महामार्ग वाहतूक पोलीस ठाणे पोलीस प्रभारी उप अधीक्षक संतोष खानविलकर, वसई – पालघर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी औदुंबर गवई, मिरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेटे, पोलीस उप निरीक्षक संतोष शेंडगे, मनोहर पाटील, पालघर ग्रामीण मनोर पोलीस निरीक्षक रवींद्र बयेस,वसई विरार शहर मनपा कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, कनिष्ट अभियंता विजय चव्हाण, अमित शिंदे, ऑल इंडिया वाहन चालक संघटना हरभसनसिंह नानादे, टीमा असोसिएशनचे पदाधिकारी व इतर अधिकारी वर्ग, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- ठेकदारांने १५ दिवसात सातवली उड्डाणपूलाच्या सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
- ४०० वीजेचे खांब लावावे.
- दुभाजकाची उंची वाढवणे
- तीन शिफ मध्ये किमान ६० ट्राफिक वार्डन मागणी
- सातवली उड्डाण पुलाच्या कामामुळे १४ लोकांचा नाहक बळी गेल्याने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.
- पादचारी करिता पूल बनवावे.
- रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन देण्यात आले.
- वाहतूक कोंडीतून सर्वसामान्य नागरिकांची मुक्तता केली जाईल असे सर्वांनी आश्वासहित केले.