लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर: २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका वाडा तालुक्याला बसला असून या तालुक्यातील १३८८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात एकंदर भात, नाचणी, वरई या जिरायत पिक व बागायती पिके यांचे एकूण १५८९ हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले असून नुकसान भरपाईसाठी १४९ लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

पालघर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर डहाणू व तलासरी तालुक्यात कमी होता. डहाणू व तलासरी क्षेत्रात कोणत्याही शेतकरी किंवा बागायतदाराचे नुकसान झाल्याचे दिसून आले नाही. या पावसात सर्वाधिक नुकसान हे वाडा तालुक्याचे झाल्याचे दिसून आले आहे.

आणखी वाचा-पालघरच्या बहाडोली व बदलापूर येथील जांभळांना भौगोलिक मानांकन

भात, नाचणी, वरई या जिरायत पिकांच्या नुकसानीचा आढावा कृषी विभागाने महसूल व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने केला असून जिल्ह्यातील १३५१ हेक्टर जिरायत क्षेत्र बाधित दिसल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. वाडा तालुक्यात ११५३ हेक्टर व मोखाडा तालुक्यात १४५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती पुढे आली आहे.

जिल्ह्यातील २३८ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाला व कडधान्य क्षेत्र बाधित झाले असून त्यामध्ये बहुतांश नुकसान वाडा तालुक्याचे झाल्याचे दिसून आले आहे. नुकसान भरपाईसाठी देण्यात येणाऱ्या रकमेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

आणखी वाच-पालघर : कालव्यांच्या दुरवस्थेमुळे सूर्या प्रकल्पाच्या सिंचनक्षेत्रात सातत्याने घट, आधुनिक सिंचन प्रणालीकडे दुर्लक्ष

वाडा तालुक्यासाठी १३२ लक्ष रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बोली द्यावयाची असून मोखाडा तालुक्यात १२.३१ लाख रुपये, विक्रमगड तालुक्यात १.७४ लाख, जव्हार तालुक्यात १.४५ लाख रुपयांचा नुकसान झाले असून पालघर, वसई तालुक्यातील नुकसान भरपाईची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

वाडा: १३८८
मोखाडा: १४५
विक्रमगड: २०
जव्हार: १५
पालघर: ११
वसई: ९