बोईसर : वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड जवळ बांधण्यात येत असलेल्या देहरजी धरण प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने जाहीर केले आहे. २०२७ पर्यंत हा महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देहरजी नदीवर देहरजी धरण प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांतर्गत माती व दगडांचा वापर करून धरण बांधण्यात येत असून या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यापैकी ९३.२२ दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण प्रतिदिन २५५ दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे देहरजी प्रकल्पाचे बांधकाम करण्यात येत आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ व एममएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारानुसार एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी २५९९.१५ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या देहरजी मध्यम प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या जलसाठ्याच्या वापरासाठी व्यापक पाणीपुरवठा योजनेचा सखोल प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
देहरजी धरणासाठी विक्रमगड तालुक्यातील साखरे,खुडेद आणि जांभा गावातील २३८ हेक्टर खाजगी तसेच ४४५ हेक्टर वन जमीन अशी एकूण ६८३ हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात जाणार असून जवळपास २७२ कुटुंबे बाधीत होणार आहेत. बाधित कुटुंबाचे वाडा तालुक्यातील खरीवली (कोहोज) येथे पुनर्वसन होणार असून त्यासाठी २९.८६ हेक्टर खाजगी जागेचे संपादन करण्यात आले आहे. मात्र धरणामुळे बेघर होणाऱ्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर धीम्या गतीने सुरू असून आधी संपूर्ण पुनर्वसन आणि नंतरच धरण अशी बाधित नागरिकांची प्रमुख मागणी आहे.
देहरजी धरण प्रकल्प सुरवातीला विक्रमगड आणि वाडा तालुक्याच्या सिंचनासाठी प्रस्तावित होता. १९७९ साली धरणाला ११.५२ कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २००५ मध्ये १५८.२५ कोटी रुपयांना नव्याने मान्यता देण्यात आली. मात्र स्थानिक नागरिकांचा विरोध, भूसंपादन आणि पुनर्वसनामधील अडचणींमुळे धरणाचे काम प्रत्यक्षात सुरु होऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात मुंबई महानगर क्षेत्रातील झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी भविष्यात लागणाऱ्या पाण्याचा विचार करून पालघर जिल्ह्यात नवीन धरणाची निर्मिती करण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार वसई विरार महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी देहरजी धरण बांधण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या दरम्यान सामजंस्य करार करण्यात येऊन २०१८-१९ च्या दरसूचीवर आधारीत १४४३.७२ कोटी रुपयांची प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र दरम्यानच्या काळात धरणाच्या बुडीत क्षेत्रातील जागेचे भूसंपादन, बाधित कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन, वितरण प्रणाली आणि इतर अनुषांगिक कामांच्या किंमतीत वाढ झाल्याने धरणाच्या एकूण खर्चात ११५५.४३ कोटींची वाढ झाली असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये :
लांबी : ६१.७५ मीटर, उंची : ७१.६० मीटर
• विद्युतनिमिर्ती : पाच मेगावॅट
• धरणाच्या खालील बाजूस सहा व वरच्या बाजूस तीन कोकण पद्धतीचे बंधारे प्रस्तावित
• धरणाचे खोदकाम १०० टक्के पूर्ण, संधानक ७० टक्के पूर्ण
प्रकल्पातून पाणीपुरवठा :
देहरजी धरणामुळे ९३.५५ दशलक्ष घनमीटर (प्रतिदिन २५५ एमएलडी) पाण्याची एकूण साठवण क्षमता उपलब्ध होणार आहे. त्यापैकी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी १९० एमएलडी पाणी राखीव ठेवण्यात येणार असून पाणी पुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी १५ एमएलडी आणि सिडको पालघर क्षेत्रासाठी ५० एमएलडी पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे.