कासा: पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्लास्टिक कापड व ताडपत्रीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. डहाणू, जव्हार, विक्रमगड, मोखाडा आणि तलासरी या तालुक्यांतील बाजारपेठांमध्ये प्लास्टिक विक्रेत्यांची संख्या वाढली असून, पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात शेतकरी प्लास्टिक खरेदी करताना दिसत आहेत.

ग्रामीण भागात घरांची रचना अजूनही पारंपरिक विटामाती व कुडाच्या स्वरूपात असल्याने पावसाळ्यात घरावर, जनावरांच्या गोठ्यावर तसेच लाकडाच्या झोपड्यांवर पाणी शिरू नये म्हणून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व ताडपत्रीचा वापर केला जातो. एप्रिल-मे महिन्यात हे साहित्य उपलब्ध असते आणि याच काळात आदिवासी व शेतकरी बांधव खरेदी करतात.

दरवाढीचा फटका

यंदा प्लास्टिकच्या दरात १५ ते २० रुपये प्रति किलो इतकी वाढ झाली आहे. मागील वर्षी हे दर ६० ते ७० रुपये किलो होते, तर यंदा हेच दर ८० ते ९० रुपयांपर्यंत गेले आहेत. एका घरासाठी किंवा गोठ्यासाठी सरासरी ८ ते १० किलो प्लास्टिक लागत असल्याने दरवाढीमुळे थेट आर्थिक भार शेतकऱ्यांवर येत आहे.

अवकाळी पावसाची डागडुजी खर्चिक

अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिकांची हानी झाल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी आता पावसाळ्याच्या तयारीसाठी वाढीव दराने प्लास्टिक खरेदी करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी आर्थिक भार येत आहे.

उलाढालीत मोठी वाढ

या काळात लाखोंची उलाढाल होत असून, बाजारपेठांमध्ये प्लास्टिक व ताडपत्रीचे दुकानं फुललेली आहेत. व्यापाऱ्यांनाही यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दरवाढ ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

सध्या स्थितीला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरकुलाची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी पाया खोदणे, पायाभरणी, विटीचे बांधकाम, कामे सुरू असल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात कुड आणि कौलाची घरे उभा करून त्यात आपला संसार थाटलेला आहे.अवकाळी पाऊस आल्यानंतर किंवा पावसाळ्यात या घरावरती कौलातून तसेच पत्र्यातून पावसाचे पाणी घरात येऊ नये तसेच उपजीविकेच्या साधनांचे नुकसान होणार नाही याकरिता मोठ्या प्रमाणात प्लास्टिक खरेदी केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी प्लास्टिक खरेदी करावीच लागते, पण यंदा दर खूप वाढलेत. आधीच नुकसान झालंय, त्यात हा खर्च परवडणं कठीण झालंय,” असं मत विक्रमगड तालुक्यातील शेतकरी दादा गवळी यांनी व्यक्त केलं.