पालघर :आपण आपल्या मातीशी इमान राहू, आपल्या मातीला विकून देणार नाही व त्याला विरोध करण्यासाठी कोणतीही किंमत मोजू अशी शपथ कमारे – टोकराळे, केळवे व माहीम येथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी प्रस्तावित टेक्स्टाईल पार्कच्या ठिकाणी जाऊन आज घेतली. पर्यावरण दक्षता संयुक्त समितीमार्फत आयोजित केलेली सहवेदना यात्रा यशस्वी होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात ठेवला होता. तसेच आयोजकांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली होती, मात्र हा दबाव झुगारून नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी होऊन या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.

पालघर जिल्ह्यातील माहीम-टोकराळे येथे रिलायन्स इंडस्ट्रीजचा प्रस्तावित टेक्स्टाईल पार्क हा केवळ एक उद्योग नसून आपल्या अस्तित्वावरच गदा आणणारे विनाशकारी संकट आहे. महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय स्थानिक भूमी, समाज आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे असे घोषित करून आज (१ जून) केळवे फुल नाका ते प्रकल्पाच्या नियोजित ठिकाणापर्यंत पर्यावरण दक्षता समिती तर्फे “चलो टोकराळे”सहवेदना यात्रेचे आयोजन केले.

ही सहवेदना यात्रा यशस्वी होऊ नये म्हणून आयोजकांना पोलीस आली सुरक्षा संहिते अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. तसेच माहीम, केळवे व केळवे रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवून तपासणी सुरू ठेवली होती. पोलिसांचे शीघ्र कृती दल व वाहतूक नियंत्रण शाखा देखील सक्रिय ठेवण्यात आली होती. या बंदोबस्तामुळे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचा संदेश समाजात गेल्याने नागरिक उस्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले.

शांतता पूर्ण आयोजित या आंदोलनात कमारे

टोकराळे सरपंच वैशाली पडवळे, केळवे सरपंच संदीप किणी, माहीम सरपंच प्रीती पाटील तसेच गावातील माजी सरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, तसेच प्रमुख राजकीय पक्ष व आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. केळवे येथील पूल नाका येथून रॅली द्वारे निघून या प्रस्तावित प्रकल्पाच्या नियोजित टोकराळे येथील ठिकाणी जाऊन सर्व उपस्थित यांनी हातात जमिनीची माती घेऊन त्यासोबत इमानी राखण्याची शपथ घेतली. नागरिकांमध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याने हे आंदोलन मर्यादित स्वरूपात आयोजित केल्याचे कमाने सरपंच यांनी याप्रसंगी सांगितले. तर या प्रकल्पाविरुद्ध आपल्या ग्रामपंचायतीने अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले असले तरीही आपल्याला चर्चेसाठी बोलावलं नाही असे कमाऱ्याचे उपसरपंच संदीप चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले. या प्रस्तावित प्रकल्पामुळे या पट्ट्यातील हिरवळ संपुष्टात येईल अशी भीती व्यक्त करत या प्रकल्पाला विरोध करण्याचा इशारा त्यांनी दिला.

पर्यावरण दक्षता संयुक्त समितीची भूमिका

या प्रस्तावित टेक्स्टाईल पार्क प्रकल्पामुळे पिढ्यानपिढ्यांची कमाई आणि भविष्य धोक्यात येणार आहे. हा प्रदूषणकारी प्रकल्प सातपाटी ते दातिवरे या स्वयंपूर्ण हरितपट्ट्याला नष्ट करेल. याभागातील कसदार शेती, हिरवीगार बागायती, मिठागरे, समुद्रावरील तसेच खाड्यांवरील उपजीविका देणारी मासेमारी आणि आपली स्वयंपूर्ण पारंपरिक जीवनशैली उद्ध्वस्त होईल. केळवे माहीम ही पर्यटन स्थळे असून या प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण तेथील नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा धोक्यात आणेल. विषारी दूषित पाणी जलस्रोतांमध्ये जाऊन आपले आरोग्यही धोक्यात येणार आहे. जागतिक तज्ज्ञांनी अशा प्रकारच्या प्रकल्पांना ‘रेड झोन’ मधील अतिघातक प्रदूषणकारी घोषित केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाने तसेच रिलायन्स व्यवस्थापनाने आजपर्यंत या प्रस्तावित प्रकल्पाबाबत कोणतीही सत्य माहिती देणे टाळले आहे. या प्रकल्पातून रोजगाराची निर्मिती होईल असे आश्वासन देणाऱ्या शासनाने आजपर्यंत पालघर जिल्ह्यात लादल्या गेलेल्या आधीच्या प्रकल्पांमध्ये किती स्थानिकांना स्थायी स्वरूपाच्या नोकऱ्या तसेच रोजगार उपलब्ध करून दिला याची माहिती सर्वश्रुत आहे. तसेच या प्रकल्पांतून कोणतेही प्रदूषण होणार नाही याची ग्वाही देणाऱ्या प्रदूषण मंडळाने अशाच प्रकारची प्रमाणपत्रे व ग्वाही तारापूर व पालघर येथील औद्योगिक वसाहती मधील कारखान्यांच्या उभारणी दरम्यान दिली होती. मात्र तरीही माहीम येथील पाणेरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेलीच राहिली आहे आणि गेल्या कित्येक वर्षांत तिचे पाणी कधी स्वच्छ झालेच नाही याकडे लक्ष वेधण्यात आले. गेल्या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित वस्त्रोद्योग प्रकल्पाविरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाची शासनाने दखल घेतली नाही असे सांगत शासन नागरिकांच्या भावनेचा आदर करत नाही असे आरोप करण्यात आले.