ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचे हाल
वाडा : करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले अनेक दिवस बंद असलेल्या पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील बहुतांशी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. या शाळांमध्ये परिसरातील अनेक गांव-खेड्यांतून विद्यार्थी बसने ये-जा करीत असतात. मात्र अनेक ठिकाणी करोनाच्या पार्श्वाभूमीवर बंद केलेल्या बससेवा अजूनपर्यंत सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
मुलींच्या पुढील शिक्षणात खंड पडू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने गेल्या दहा वर्षांपासून मानवसेवा अंतर्गत गांव-खेड्यांमध्ये बससेवा सुरू केल्या आहेत. या बससेवांमधून नजीकच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थीनी जात असतात. मात्र येथील बऱ्याचशा शाळा सुरू होऊन आठवडा झाला तरी अजूनपर्यंत मानवसेवा बससेवा सुरू न झाल्याने या विद्यार्थ्यांना कधी खासगी वाहने तर कधी पायी चालत जाऊन शाळा गाठावी लागत आहे.
ग्रामीण भागातील आश्रम शाळा, विविध संस्थांच्या माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी त्या, त्या भागातील सरपंच, ग्रामसेवक, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, आरोग्य अधिकारी यांच्या समितीने शिफारस केल्यानंतर वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यातील बहुतांशी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत.
वाडा तालुक्यात चिंचघर, अंभई, गुहीर, आमगाव, विक्रमगडमध्ये आलोंडे, साखरे, भोपोली, मुरबाड, करे, जव्हार भागातील देहेरा, वांगणी, विनवळ, दाभोसा, तर मोखाडा तालुक्यातील गोंदा, हिरवे, सूर्यमाळ, पळसुंडा, कारेगांव, सूर्यमाळ आदी माध्यमिक आणि आश्रम शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये परिसरातील शेकडो विद्यार्थी एसटी बसच्या माध्यमातून शाळांमध्ये ये-जा करायचे मात्र बऱ्याच बससेवा बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
पास काढूनही आर्थिक भुर्दंड
कासा : शिक्षणासाठी सायवन, किन्हवली अशा खेड्यापाड्यांतून कासा, डहाणूला अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. विद्यार्थ्यांनी शाळेत वेळेवर जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसचे पास काढले आहेत. परंतु या बस वेळेवर धावत नसल्याने पाससाठी पैसे भरूनसुद्धा खासगी वाहनाने प्रवास करत शाळा गाठावी लागत आहे. तर काही विद्यार्थ्यांकडे खासगी वाहनाने प्रवासासाठी पैसे नसल्याने शाळेला जाता येत नाही. डहाणू आगारातून वेळेवर बस सोडून विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप दूर करावा, अशी मागणी शेजल पटेलसह अनेक विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत डहाणू आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
विद्यार्थीनींच्या ‘मानवसेवा’ बसमध्ये खासगी प्रवासी
वाडा तालुक्यात विविध खेडोपाड्यांतून चार हजारांहून अधिक विद्यार्थी एसटी बसनेच शाळेत येत असतात. सध्या नगरपंचायत क्षेत्रातील (वाडा शहरातील) माध्यमिक शाळा बंद असल्या तरी खेडोपाड्यांत सुरू करण्यात आलेल्या माध्यमिक शाळा गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. विद्यार्थीनींसाठी असलेल्या मानवसेवेच्या बसमधून खासगी प्रवासी सेवा सुरू असताना दिसत आहे.
ज्या शाळा सुरू झाल्या आहेत, त्या मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी स्थानिक समितीची मागणी येताच बससेवा सुरू करण्यात येईल. -आशीष चौधरी, साहाय्यक विभाग नियंत्रक, पालघर विभाग.