जव्हार तालुक्यात भीषण पाणीटंचाई कासा : जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायत हद्दीतील हुंबरण या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकायला लागत आहे. पाणी आणायच्या कामात लहान मुलांचीही मदत घेतली जात असून गावातील महिला आणि लहान मुले यांना पाण्यासाठी एक दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या हातपंपावर जावे लागत आहे. पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायत मधील हुंबरण गावामध्ये साधारणपणे दीडशे ते पावणेदोनशे कुटुंब म्हणजेच सुमारे हजार दीड हजार लोकवस्ती आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने या सगळ्यांचे पाण्यासाठी अतिशय हाल होत आहेत. गावातील महिलांचा संपूर्ण दिवस पाणी मिळवण्यासाठी जात असल्याने रोजगार बुडत आहे. हुंबरण हे गाव टेकडीवर असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर डोंगर उतरून पाणी घेऊन पुन्हा तेवढेच अंतर चढून जावे लागते. त्यामुळे हंडाभर पाणी मिळवण्यासाठी महिलांचे एक ते दीड तास मेहनत करावी लागत आहे . या गावामध्ये पाणीटंचाईची स्थिती असताना याकडे शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पिण्यासाठी पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे आणि पाणी पुरवणे ही शासनाची जबाबदारी आहे असे असतानाही हुंबरण गावातील साडेबाराशे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाने गावाला बारामही पाण्याची सोय करून द्यावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. एकीकडे डिजिटल इंडिया मोहीम राबवली जात आहे तर दुसरीकडे अजूनही पालघर जिल्ह्यच्या ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना पाणी, रस्ते, वीज या सारख्या मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे.गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा अभियंता यांच्याशी भेट घेऊन जल जीवन मिशन अंतर्गत हुंबरण गावात पाणी पुरवठा सुरू करावा या साठी मी स्वत: जातीने लक्ष घालणार आहे. -एकनाथ दरोडा, अध्यक्ष, बविआ, जव्हार तालुका