पालघर : पालघर रेल्वे स्थानकात विद्युत प्रणालीमध्ये बिघाड झाल्याने रात्री उशिरापर्यंत पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली होती. विरार येथून सफाळे येथे येणाऱ्या नागरिकांनी रोरो ने तर पालघर व डहाणूकरिता एसटीने जादा फेऱ्या उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांनी पर्यायी सेवांचा वापर करून रात्री उशिरा घर गाठले.

मुंबई कडून अजमेर कडे जाणारी अजमेर एक्सप्रेस पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत असताना विद्युत प्रणालीमध्ये दोष होऊन ६.४५ वाजता दरम्यान विद्युत तारा गाडीवर पडल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी सायंकाळी मुंबई कडून गुजरात कडे जाणाऱ्या व गुजरात कडून मुंबईकडे येणाऱ्या अनेक जलद व उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या होत्या.

सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळी ही घटना घडल्याने आणि प्रवासी विरार व डहाणू स्थानकात अडकून पडले होते. तर काही गाड्या अपघातादरम्यान ज्या स्थानकात उभ्या होत्या तिथेच थांबवण्यात आल्या. त्यामुळे स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्र होत असल्याने अनेक प्रवाशांनी ज्यादा पैसे देऊन खाजगी वाहनांचा वापर केला.

विरार वरून सफाळे येथे येण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी रोरो सेवेला प्राधान्य दिले. एसटी प्रशासनाकडून सफाळे रेल्वे स्थानकातून जलसार रोरो जेटी पर्यंत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रवाशांच्या सोयीकरिता रात्री १० वाजता बंद होणारी रोरो सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे विरार येथून सफाळे व सफाळे येथून विरारकडे जाणाऱ्या अधिकतर नागरिकांनी रोरो जेटीचा वापर केला.

रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकाजवळ विद्युत बिघाडामुळे अडकलेली बांद्रा अजमेर गाडी पुढे नेण्यात आली व त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला वेग आला. मध्यरात्री पूर्वी पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची सेवा तसेच डहाणू रोड पर्यंतची उपनगरीय सेवा काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या होत्या.

गाड्यांमध्येच अडकल्याने प्रवाशांचे हाल

मुंबई येथून घरी परतणाऱ्या तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे विविध रेल्वे स्थानकांमध्ये अडकून पडल्याने अतोनात हाल झाले. सायंकाळच्या वेळी गाड्यांमध्ये असणारी तुडुंब गर्दी, अर्ध्यावर थांबलेल्या गाड्या व रेल्वे सेवा पूर्ववत होण्याचा अंदाज नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. प्रशासनाने स्थानिक पातळीवर सुविधा दिली असली तरी राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकडे जाणारे व येणारे प्रवासी गाडीतच अडकून बसले.

रात्री उशिरापर्यंत गाड्या रद्द

विद्युत प्रणालीमध्ये बिघाड आल्यामुळे सायंकाळी पावणे सात वाजल्या नंतरच्या अनेक लांब पल्लच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर डहाणू येथून विरार कडे येणाऱ्या व विरार येथील डहाणू कडे जाणाऱ्या उपनगरीय फेऱ्या देखील पूर्णतः बंद करण्यात आल्या होत्या. सकाळपासून देखील काही फेऱ्या अंशतः बंद ठेवण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य परिवहनच्या २८ जादा बस

रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशी पालघर, सफाळे, विरार, बोईसर रेल्वे स्थानकावर अडकलेले होते. त्यांच्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने २८ बसेस जादा सोडण्यात आल्या होत्या. यामध्ये पालघर रेल्वे स्थानकावरून बोईसर व डहाणू साठी १० बस, सफाळे रेल्वे स्थानकावरून पालघर व दातीवरी जेट्टीसाठी ५ बस, विरार रेल्वे स्थानकावरून बोईसर, पालघर साठी ८ बस, बोईसर रेल्वे स्थानकावरून पालघर व डहाणू साठी पाच बस सोडण्यात आल्या होत्या.