नागपूर : नवनीत राणा यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध असताना भाजपाने अमरावतीमधून त्यांना उमेदवारी दिल्याने संतापलेल्या आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्याविरुद्ध उमेदवार दिल्यानंतर रामटेक लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून महायुतीशी जुळवून न घेण्याचे संकेत दिले आहे.

अमरावती आणि रामटेक हे दोन्ही मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्रामुळे चर्चेत आले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता. परंतु त्या विरोधाला न जुमानता भाजपने राणा यांच्या उमेदवारी दिली आणि नंतर पक्ष प्रवेश करवून घेतला. यामुळे दुखावलेल्या बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे गटातील सुरेश बुब यांना समर्थन देत राणा विरुद्ध उमेदवारी दिली आहे. भाजपने बुब यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केला असतानात कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. येथे काँग्रेसमधून आलेलेले आमदार राजू पारवे यांना शिंदे सेनेकडून लढवण्यात येत आहे. अशाप्रकारे बच्चू कडू यांनी अमरावतीनंतर रामटेकमध्येही महायुतीवर प्रहार केला आहे.

हेही वाचा – नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…

अमरावतीधून भाजपकडून लढत असलेल्या नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. रामटेकमधून काँग्रेसची उमेदवारी मिळालेल्या रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने अर्जाच्या छाननीच्या दिवशी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते.

हेही वाचा – काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीमध्ये बच्चू कडू यांना सन्मान दिला जात नाही. राणा दाम्पत्य बच्चू कडू यांच्यावर खोटे आरोप करतात. त्यांची निंदा नालस्ती करतात आणि भाजपा अशा व्यक्तीला उमेदवारी बहाल करतात. हा प्रकार प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावण्याचा आहे. तर रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून रद्द करण्यात आले आहे. हा मागासवर्गीय महिलेवर अन्याय आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा देण्याचा ठराव घेतला आणि त्याला बच्चू कडू यांची मान्यता घेण्यात आली, असे प्रहार जनशक्ती पक्षाते नागपूर जिल्हा प्रमुख रमेश कारेमोरे यांनी म्हटले आहे.