राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती, बीड व पिंपरी-चिंचवडमधील दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात उघडपणे बोलण्याचे टाळून सावध पवित्रा घेतला तर छगन भुजबळ यांनी शरद पवार हे केवळ मराठेतर नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये सभा घेतात, असा थेट हल्ला चढवून पवारांना लक्ष्य केले.

गेल्या तीन दिवसांत राष्ट्रवादीत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. पक्षातील बंडानंतर अजित पवार प्रथमच बारामतीमध्ये दाखल झाले. त्याआधी त्यांनी पिपंरी-चिंचवड या एकेकाळच्या प्रभाव क्षेत्रात भेट दिली. तसेच शरद पवारांच्या सभेला प्रत्युत्तर देण्याकरिता बीडमध्ये सभा घेतली. पण तिन्ही दौऱ्यांमध्ये अजित पवार यांनी आपले काका व राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात उघडपणे बोलण्याचे टाळले. पक्षातील फुटीनंतर मुंबईतील वांद्रे येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवारांवर थेट हल्ला चढविला होता. ‘वय ८० झाले, ८२ झाले. कधी थांबणार आहात की नाही’, असे विधान करीत शरद पवार यांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता. शरद पवार यांनाच निवृत्तीचा सल्ला दिल्याने अजित पवारांविषयी जनमानसात वाईट प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर उघडपणे आरोप व टिप्पणी करण्याचे टाळले आहे.

हेही वाचा – मध्य प्रदेश : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार, जातीय समतोल साधण्यासाठी शिवराजसिंह चौहान यांचा निर्णय!

बीडच्या सभेत छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीकाटिप्पणी केली. बंडानंतर शरद पवारांनी पहिली सभा येवल्यात घेतल्याची बाब छगन भुजबळ यांना फारच झोंबलेली दिसते. बीडच्या सभेत भुजबळ यांनी पवारांना यावरून टोला लगावला. भुजबळ, मुंडे आणि हसन मुश्रीफ या तीन नेत्यांच्या मतदारसंघांतच पवारांच्या सभा झाल्या. यातून भुजबळ व मुंडे या ओबीसी आणि मुश्रीफ या अल्पसंख्याक नेत्यांच्या मतदारसंघात पवारांनी सभा घेऊन ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाला पवारांनी डिवचल्याचा हल्ला भुजबळांनी चढविला. येवला, बीड आणि कोल्हापूरमध्ये पवार बंडखोरांवर टीका करणार आणि बारामती गेल्यावर नमते घेणार, अशी टिप्पणीही भुजबळांनी केली. तसेच अजित पवार यांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करून भुजबळ यांनी शरद पवार हे आता राष्ट्रवादीचे अध्यक्षपदी राहिलेले नाहीत, असे अधोरेखित केले. राष्ट्रवादीचे अन्य नेते मात्र राष्ट्रीय अध्यक्षपदाचा उल्लेख टाळतात.

हेही वाचा – आप पक्ष बिहारमध्ये निवडणूक लढवणार, विरोधकांच्या आघाडीत बिघाडी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार यांनी आपल्या भाषणातून विकासासाठी भाजपला साथ दिल्याचा मुद्दा तिन्ही ठिकाणी मांडला. अजितदादांनी पक्षांतर्गत घडामोडी किंवा शरद पवारांवर टीका करण्याचे टाळले. अजित पवार यांच्या बारामतीतील दौऱ्यापूर्वी राष्ट्रवादीतच फूट पडलेली नाही, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी री ओढली. शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला, पण अजितदादांनी संयम अजून तरी बाळगला आहे.