लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट इथल्या आध्यात्मिक गुरु जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांच्या आश्रमाला भेट दिली. या भेटीदरम्यान जगद्गुरुंनी लष्करप्रमुखांना स्पष्ट आवाहन केले. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात परत आणण्याचे आवाहन यावेळी जगद्गुरुंनी लष्करप्रमुखांना केले. आध्यात्मिक गुरुंनी गुरुवारी जनरल द्विवेदी यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली. बुधवारी श्री तुलसी पीठ चित्रकूट धामला त्यांनी भेट दिली होती.
जनरल द्विवेदी यांच्या आश्रमातील भेटीदरम्यान आध्यात्मिक नेते जगद्गुरु यांनी सांगितले की, त्यांना राम मंत्राने दीक्षा देण्यात आली होती. हा मंत्र भगवान हनुमानाने माता सीतेकडून प्राप्त केला होता आणि नंतर लंका जिंकली होती. लष्करप्रमुखांनी आश्रमातील संत आणि विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. तसंच राष्ट्रीय सुरक्षेसोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांप्रती सैन्याच्या वचनबद्धतेवरही प्रकाश टाकला.
“मला पीओके हवा”
लष्करप्रमुखांच्या या भेटीबद्दल बोलताना जगद्गुरु म्हणाले, “भारतीय लष्करप्रमुख माझ्याकडे आले. त्यांनी माझ्याकडून राम मंत्राने दीक्षा घेतली. हा तोच मंत्र आहे, जो हनुमानजींनी सीताजींकडून प्राप्त केला आणि लंकेवर विजय मिळवला. त्यानंतर जेव्हा दक्षिणेची वेळ आली तेव्हा मी म्हटले की मी अशी दक्षिणा मागेन जी यापूर्वी कोणत्याही गुरुने मागितली नाही. त्यावेळी मी म्हणालो की, “मला पीओके (पाकव्याप्त काश्मीर) हवे आहे.” त्यांनी माझी विनंती मान्य केली. आम्ही पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यास तयार आहोत असेही सांगितले. भारताने जर हल्ले केले तर पाकिस्तान नकाशावरूनच गायब होईल.”
ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि हवाई दलप्रमुख मार्शल एपी सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांची ही कामगिरी खूप मोलाची आणि कौतुकास्पद आहे.
यापूर्वी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरवर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक पुस्तिका प्रसिद्ध केली होती. यामध्ये लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईचे निरीक्षण केले जात असलेल्या ऑपरेशन रूमचे वर्णन केले होते. या पुस्तिकेत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि हवाई दलप्रमुख मार्शल एपी सिंग यांचीही प्रतिमा आहे.
या भेटीनंतर लष्करप्रमुखांनी सद्गुरु नेत्र चिकित्सालयाचीही पाहणी केली. तिथल्या सुविधांचा आढावा घेतला. जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा हा दौरा सध्या चर्चेत आहे, तो म्हणजे जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्या पाकिस्तानबाबतच्या वक्तव्यावरून. द्विवेदी हे त्यांच्या पत्नीसह चित्रकूट इथे गेले होते. तिथे तुलसी पीठ स्थित कांच मंदिर इथे त्यांनी जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्याशी बातचित केली.
ऑपरेशन सिंदूर
२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटक आणि एका स्थानिक मार्गदर्शकाचा मृत्यू झाल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केले होते. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून भारताने या हल्ल्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले आणि पाकच्या हवाई तळांवर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हल्ले केले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांमध्ये जम्मू-काश्मीरमधील तसंच जवळपास भागातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला होता. यामध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही बळी गेला होता.