मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाने सट्टा बाजारात प्रचंड उलथापालथ झाली आहे. सट्टेबाजांसाठीही अनपेक्षित ठरलेल्या या निकालामुळे त्यांना हजारो कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीचा हंगामात मोठा नफा मिळवण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून बेकायदा बेटिंग अॅप्सवर सट्टेबाजी घेणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. पण त्यांचे अंदाज पूर्णपणे चुकले. जाणकाराने दिलेल्या माहितीनुसार मतदानाच्या दहा दिवसांपूर्वी, भाजप ७० जागा मिळवेल असा अंदाज होता. निवडणुकीच्या दिवसापर्यंत भाजप ८० जागा मिळवून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज होता.

तसेच निवडणुकीनंतर युतीचे सरकार पुन्हा येण्याची शक्यता असल्यामुळे मतदान संपल्यानंतर त्यांनी ८५ जागांचा अंदाज लावला होता. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपनेच १०० हून अधिक जागा जिंकल्या, त्यामुळे सट्टेबाजी घेणाऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय सट्टा बाजाराने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढाई होईल, असा अंदाज बांधला होता. युतीला की आघाडीला बहुमत मिळतेय, त्यावर सर्वाधिक सट्टा लागला होता. बुकींनी महायुतीसाठी १३३ ते १५४ जागांचा अंदाज वर्तवला होता, तर महाविकास आघाडी ११० ते १२७ जागांपर्यंत पोहोचेल असे गृहित धरले होते. अपक्ष उमेदवारांना ४ ते ८ जागा मिळतील असे भाकीत करण्यात आले होते.

हेही वाचा >>> ठाणे शहरात मनसेची केवळ ‘प्रचारहवाच’

परंतु महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा मिळाल्याने सट्टेबाजांचे सर्व अंदाज फसले. त्यामुळे सट्टेबाजी घेणाऱ्यांचेही कोट्यवधींचे नुकसान झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेसाठी सट्टेबाजी सुरू करण्यात आली, त्यावेळी भाजपच्या ५६ जागा, काँग्रेसच्या ४२ जागा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) ३२ जागा, दोन्ही राष्ट्रवादी (अजित पवार गट व शरद पवार गट) यांच्या ५० च्या वर जागा, शिवसेनेच्या(शिंदे गट) २५ जागा निश्चित मानल्या जात होत्या. उर्वरित ५८ जागांवर निकाल बदलण्याची शक्यता सट्टेबाजांनी व्यक्त केली होती. त्यातील २५ जागा महायुती अथवा महाआघाडी यापैकी कोणाच्या पारड्यात पडतील, ती सरकार स्थापन करेल, असा अंदाज होता. पण भाजपने १३२ जागा मिळवल्या. तर शिंदे गटाला ५७ जागा, अजित पवार गटाला ४१ जागा मिळाला. महाआघाडीला ५०च्या वरही जागा मिळवता आल्या नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध मुद्द्यांचे अंदाज

स्थानिक परिस्थितीसह धार्मिक मुद्दे, जातीय मुद्दे, महागाई, लाडकी बहिणी योजना, महायुती व महाआघाडीचे वचननामे अशा विविध मुद्दे लक्षात घेऊन सट्टेबाजांनी अंदाज व्यक्त करून त्यावर सट्टेबाजी घेतली होती. पण विधानसभेच्या निकालामुळे सट्टेहबाजांचेही अंदाज चुकले. त्याचा परिणाम त्यांना हजारो कोटींचे नुकसान झाले, असे सूत्रांनी सांगितले.