बिहार सरकारने राज्यभरात केलेल्या जातीनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल सोमवारी (दि. २ ऑक्टोबर) रोजी प्राप्त झाला. ज्यामध्ये राज्यात सर्वदूर विखुरलेला ‘अत्यंत मागासवर्गीय समाज’ (Extremely Backward Classes – EBC) तब्बल ३६.०१ टक्के असल्याचे समोर आले आहे. ईबीसी प्रवर्गात १३० विषम गट आणि उप समूह आहेत. ज्यामध्ये न्हावी, कोळी (ज्यांची सहानी, निषाद, केवत अशी आडनावे आढळतात), लोहार, तेली आणि नोनिया (नोन किंव नून (मीठ) तयार केल्यामुळे हे नाव पडले) या जातींचा प्रामुख्याने या वर्गात समावेश असून त्यांची संख्या इतर जातींपेक्षा लक्षणीय आहे. या पाचही जाती जगण्यासाठी प्रभावशाली गटावर अवलंबून आहेत, या जातींना बिहारमध्ये पाचपुनिया असेही म्हटले जाते.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी सर्वात आधी ईबीसी गटाचे सामाजिक अंकगणित हेरले, या गटातील जातींची एकत्रित संख्या ही इतर कोणत्याही प्रभावशाली गटापेक्षा अधिक आहे. जसे की, यादव (जातीनिहाय जनगणनेनुसार १४.२७ टक्के लोकसंख्या) आणि मुस्लीम (जवळपास १७ टक्के) यांच्या संख्येपेक्षाही ईबीसींची संख्या अधिक आहे.

हे वाचा >> Bihar Caste Survey : ईबीसी वर्गाची संख्या सर्वाधिक; बिहारचे जातीय समीकरण कसे आहे?

लालू प्रसाद यादव यांनी सर्वात आधी मोठ्या कुशलतेने या गटाला पंचफोरान (पाच मसाल्यांचे मिश्रण) असे नाव दिले. यामागची कल्पना अशी होती की, कोणत्याही खाद्यपदार्थात जर पंचफोरान टाकले तर त्या पदार्थाची चव आणखी चांगली होते. त्याचप्रकारे ईबीसी कोणत्याही आघाडीत समाविष्ट करता येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे नितीश कुमार यांना कोणत्याही सामाजिक गटाचा पाठिंबा नव्हता. नितीश कुमार मुख्यमंत्री असताना ईबीसी गटाला आरक्षण, शैक्षणिक मदत आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन जवळ करण्याचा प्रयत्न केला. भाजपानेदेखील या गटाला कुरवाळण्याचा प्रयत्न केला आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची जात आणि चहावाला ही प्रतिमा पुढे करून ईबीसी गटाचा पाठिंबा भाजपाला मिळवून दिल्याचे दिसते.