नागपूर: काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे रिकामा वेळ भरपूर आहे, त्यामुळे ते सारखे यात्रा काढत असतात, काँग्रेसच्या यात्रेला प्रतिसाद मिळत नाही, त्या निरर्थक आहेत, अनेक वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी काय केले ते आधी सांगावे , असे एक नव्हे तर अनेक आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ् बावनकुळे यांनी काँग्रेसच्या कृषी आत्मसन्मान यात्रेपूर्वी केले. यावरून भाजपने या यात्रेचा किती धसका घेतला याची प्रचिती येते
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आजपासून यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी या गावातून शेतकरी सन्मान यात्रेला सुरूवात होत आहे. हे तेच दाभाडी गाव आहे जेथे २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचार काळात नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान बदलण्याचे अनेक आश्वासने दिली होती. त्याची आठवण करून देण्यासाठी काँग्रेसची ही यात्रा आहे. मात्र काँग्रेसपेक्षा भाजपने ते अधिक गांभीर्याने घेतल्याचे या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या टिकेवरून दिसून येते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी यात्रेबाबत नागपुरात येऊन पत्रकार परिषद घेतल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ् बावनकुळे यांनी या यात्रेवर सडकून टीका केली. ते म्हणाले काँग्रेसची यात्रा निरर्थक आहे, तिला लोक प्रतिसाद देत नाही.
ही यात्रा निरर्थक आहे, तिला प्रतिसाद मिळत नाही हे भाजप नेत्यांना ठाऊक असूनही ते त्याची दखल का घेतात असा सवाल काँग्रेस जणांनी केला आहे. काँग्रेसच्या शेतकरी यात्रेवर टीका करताना भाजप प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात काय केले? असा सवाल केला तसेच भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारने काय केले याचा पाढाही वाचला. मात्र हे करताना दाभाडीत २०१४ मध्ये मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या (हमीभावापेक्षा अधिक भाव, उत्पादन खर्च अधिक नफा समाविष्ट करून कृषीमालाची दरनिश्चिती व अन्य) दिलेल्या आश्वासनाचे काय झाले याबाबत अवाक्षरी काढले नाही. याचा अर्थ ती आश्वासने अद्यापही पाळल्या गेली नाही हे स्पष्ट होते व याचीच आठवण करून देण्यासाठी ही यात्रा असल्याने ती भाजपच्या जीव्हारी लागल्याचे दिसून येते.
कोणी काय केले?
काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात काय केले ? असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला. पण त्यांना डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी केलेली कर्जमाफी आठवली नाही तसेच भाजपने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन देऊन ते पाळले नाही याचेही विस्मरण झाले. अलीकडेच राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीसाठी करण्यात येणाऱ्या मदतीच कपात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्राच्या निकषापेक्षा अधिक मदत करण्याचा आव आणणाऱ्या महायुती स रकारने आता केंद्र व राज्यात समान नियम असावे असे कारण देऊन या कपातीचे समर्थन केले आहे. एकूणच शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाबाबत नेहमीच टोलवाटोलवी व गुळमुळीत भूमिका घेणाऱ्या महायुतीतील नेत्यांना काँग्रेसच्या यात्रेमुळे त्यांची पोलतर खुलणार नाही ना याची भीती वाटू लागली , अशी टीका आता होत आहे.