सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : हैदराबाद मुक्ती लढ्यात शहीद झालेले बचित्तर सिंह यांच्या नळदुर्ग येथील दुर्लक्षित स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण करून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ राजकीय बांधणीस प्रारंभ केला. लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या अंगावर चिरंजीवींनी वाहन घातल्याच्या चर्चेने देशभर वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या मिश्रा यांच्यावर राज्यातील उस्मानाबाद, माढा व सिंधुदूर्ग मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. हैदराबाद मुक्ती लढ्याला रझाकाराविरोधाची पार्श्चभूमी असल्याने त्याचा ध्रुवीकरणाला उपयोग होऊ शकतो, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना भाजप नेत्यांनी निजामाची उपमा दिली होती. तर मराठवाड्यात एमआयएमचा काही मतदारसंघात प्रभाव असल्याने बचित्तर सिंह यांचे स्मृतिस्थळ आकर्षक करण्याची तयारी हाती घेण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली या गावातील एका मतदान केंद्राची मिश्रा यांनी पाहणी केली. मतदान केंद्राची जबाबदारी असणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते निवडून आलेल्यांची ताकद कशी व कुठे, जातनिहाय व धर्मनिहाय मतदान तसेच मतदानाचा एकूण कल याचा अभ्यास उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्ण करण्यात आला. या लोकसभा मतदारसंघात लोकसभेचा उमेदवार कोण हे अद्यापि ठरले नसले तरी तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव चर्चेत आणले जात आहे. न लढलेल्या १४४ लोकसभा मतदारसंघात तसेच एकदाच निवडून आलेल्या मतदारसंघात दौरे आयोजित करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये मिश्रा यांच्याकडे असणाऱ्या अनेक विधानसभा मतदारसंघात यश मिळाले होते. त्यामुळे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वेगवेगळी रणनीती अवलंबली जाण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे मिश्रा यांनी भाजप नेत्यांची बैठक घेऊन कोणत्या बाबींकडे लक्ष घालावे, याबाबतच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा… विदर्भात तज्ञ नाहीत का?

हेही वाचा… राजेश टोपेंसमोर आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात असून ओम राजेनिंबाळकर प्रतिनिधित्व करत आहेत. भूम-परंडा व उमरगा विधानसभा मतदारसंघ हे भाजप-शिंदे गट युतीकडे आहेत. मतदारसंघातील भाजपची शक्तिस्थळे व कार्यकर्त्यांची बांधणी करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, हिंगोली, परभणी औरंगाबाद या शिवेसना लढवित असणाऱ्या जागांवर आता भाजपाने तयारी सुरू केली आहे.