BJP Search for next UP Chief : देशातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपाच्या संघटनात्मक निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लवकरच पक्षाकडून नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपाचे पुढील अध्यक्ष कोण असणार याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. एकीकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची चर्चा होत असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष निवडीवरून पक्षासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
उत्तर प्रदेशात पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व इतर मागासवर्गीय (OBC) समुदायातील नेत्याचा शोध घेत असल्याची माहिती आहे. पक्षातील एका नेत्यानं सांगितलं, “अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षानं उत्तर प्रदेशात पिछडा, दलित, अल्पसंख्याक (PDA) या नव्या सामाजिक समीकरणाचा अजेंडा पुढे रेटल्यामुळे भाजपावरही दबाव आहे. ‘सपा’ला त्यांच्या शैलीत उत्तर देण्यासाठी भाजपानंही मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय समुदायातूनच प्रदेशाध्यक्ष निवडण्याची मागणी होत आहे. सध्या राज्यात भाजपाकडे एखादा दलित समुदायातील प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे या पदावर ओबीसी नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.”
२०२७ च्या निवडणुकीवर भाजपाचे लक्ष
उत्तर प्रदेशमध्ये इतर मागासवर्गीय समुदायातील सर्वाधिक मतदार आहेत. २०२७ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे जातीय समीकरण लक्षात घेऊन भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व प्रदेशाध्यपदी ओबीसी नेत्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेऊ शकतं, असं पक्षातील अंतर्गत सूत्रांनी सांगितलं आहे. भाजपानं सध्या पूर्व उत्तर प्रदेशावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला या भागात मोठा फटका बसला होता. पूर्व उत्तर प्रदेशातील २४ जागांपैकी समाजवादी पार्टीनं १४ जागा जिंकल्या होत्या; तर भाजपा आणि त्याची सहयोगी अपना दल (सोनेलाल) यांना केवळ १० जागाच जिंकता आल्या होत्या.
आणखी वाचा : मुख्यमंत्रिपदावरून एनडीएमध्ये फूट? जुन्या मित्रपक्षाने का सोडली भाजपाची साथ
प्रदेशाध्यक्ष पूर्व उत्तर प्रदेशातीलच का हवाय?
भाजपाच्या पूर्व उत्तर प्रदेशाकडे लक्ष असण्याविषयी सविस्तर माहिती देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका पदाधिकाऱ्यानं सांगितलं की, या भागातील एखाद्या नेत्याची प्रदेशाध्यपदी निवड केली जाऊ शकते, ज्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाचं झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होईल. उत्तर प्रदेशातील ओबीसी मतांसाठी भाजपा त्यांचे सहयोगी पक्ष अपना दल (सोनेलाल), निषाद पार्टी, सुभासपा (सुहेलदेव भारतीय समाज पक्ष) व राष्ट्रीय लोक दल (RLD) यांच्यावर अवलंबून आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समाजाचा राष्ट्रीय लोक दलाला पाठिंबा आहे; तर कुर्मी समुदायातील मतदार अपना दलाच्या पाठीशी आहेत. निषाद म्हणजेच नावाडी व मच्छीमार समुदायातील मतदारांवर निषाद पार्टीचा प्रभाव आहे.
भाजपाच्या घटनेनुसार प्रदेशाध्यक्षांची निवड कशी होते?
भाजपाने नुकतीच राज्यातील ९८ जिल्हाध्यक्ष आणि ७० शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. आता प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तीसाठी पक्षाकडून प्रभावी नेत्याचा शोध घेतला जात आहे. गेल्या महिन्यातच भाजपानं प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्याचं नियोजन केलं गेलं होतं. मात्र, आवश्यक त्या संख्येमध्ये जिल्हा व शहर अध्यक्षांच्या नियुक्त्या न झाल्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. भाजपाच्या संविधानानुसार, एखाद्या राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्हा व शहर अध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्याशिवाय प्रदेशाध्यक्षाची निवड करता येत नाही.
भाजपानं यापूर्वी पूर्व उत्तर प्रदेशातून सूर्य प्रताप शाही आणि रामपति राम त्रिपाठी यांसारख्या नेत्यांना उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं गेलं होतं. मात्र, हे दोघेही सवर्ण समाजातून आले होते. सध्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा भूपेंद्र सिंह चौधरी सांभाळत आहेत, जे राज्याच्या पश्चिम भागातील जाट समाजातील नेते आहेत. त्यांची नियुक्ती ऑगस्ट २०२२ मध्ये झाली होती. भूपेंद्र सिंह चौधरी यांनी कुर्मी समुदायातील नेते स्वातंत्र्य देव सिंह यांची जागा घेतली होती.
हेही वाचा : जातीनिहाय सर्वेक्षणामुळे काँग्रेस गोत्यात? पक्षातील नेत्यांमध्ये दरी का वाढतेय?
प्रदेशाध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार कोण?
भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह पुन्हा या पदासाठी दावेदार असू शकतात, असं सांगितलं जातं आहे. त्यांच्यासोबतच काही इतर ओबीसी नेतेही प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. त्यामध्ये राज्यमंत्री धर्मपाल सिंह, केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा आणि राज्यसभा खासदार बाबूराम निषाद यांच्या नावाचा समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. धर्मपाल सिंह आणि बी. एल. वर्मा हे दोघेही लोढ (Lodh) ओबीसी समाजातून आहेत, ज्यांचा बुंदेलखंड व रोहिलखंड या भागांमध्ये मोठा प्रभाव आहे. लोढ समुदाय हा भाजपाचा पारंपरिक मतदार मानला जातो. माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या प्रभावामुळे या समुदायातील लोक भाजपाला मतदान करीत असल्याचं सांगितलं जातं. कल्याण सिंह हे राज्यातील भाजपाचे सर्वांत मोठे ओबीसी नेते मानले जात होते.
प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे की, फक्त ओबीसी नेत्यालाच प्रदेशाध्यक्ष केले जाईल, असे निश्चित नाही. त्यांच्या मते, भाजपाकडून काही दलित नेत्यांचाही विचार केला जात आहे, ज्यामध्ये माजी खासदार राम शंकर कठेरिया, विनोद सोनकर, नीलम सोनकर व माजी विधान परिषदेचे सदस्य विद्यासागर सोनकर यांचा समावेश आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार दिनेश शर्मा व माजी खासदार हरीश द्विवेदी (हे दोघेही ब्राह्मण समाजातून आहेत) यांची नावेही प्रदेशाध्यपदासाठी चर्चेत होती. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, दोघांचीही या पदावर निवड होण्याची कमी शक्यता आहे, असे एका भाजपा नेत्याने सांगितले.
“मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सवर्ण समाजातील (ठाकूर) आहेत. त्यामुळे पक्षाला राज्यातील बहुसंख्य लोकांचे प्रतिनिधित्व करणारा नेता हवा आहे,” असं भाजपा नेत्यानं स्पष्ट केलं. या प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबद्दल भाजपाचे प्रवक्ते अवनीश त्यागी म्हणाले की, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची निवड ही लोकशाही पद्धतीने होते. तसेच कार्यकर्त्यांच्या भावनाही या प्रक्रियेत लक्षात घेतल्या जातात. लवकरच प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.