मुंबई : मुंबईच्या विकासासाठी सर्वात आधी मुंबई महापालिकेची निवडणूक घ्यायला हवी. सर्वोच्च न्यायालय गेली दोन वर्षे फक्त तारखांवर तारखा देत आहे. प्रभागांची संख्या कितीही असू द्या आधी निवडणूक घ्या, कोणीही जिंकेल, पण निवडणूक झाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी मांडली.

आमचे सरकार आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला प्राधान्य असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर मुंबईचा विकास करायचा असेल तर मुंबई महापालिकेला आणि महापौरांना अधिक अधिकार द्यायला हवेत. मुंबई महापालिकेवर नुसत्याच जबाबदाऱ्या नकोत, तर अधिकारही हवेत, असेही मत ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच एमएमआरडीएसारख्या जबाबदारी नसलेल्या प्राधिकरणांची मुंबईला आवश्यकता नसल्याचे मतही त्यांनी मांडले.

‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिटिकल टाऊन हॉल’ अंतर्गत एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चगेटच्या इंडियन मर्चंट चेंबरमध्ये झालेल्या या चर्चासत्रात वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार खासदार मिलिंद देवरा सहभागी झाले होते. देवरा आणि ठाकरे यांच्यात लढत होणार असून हे दोघेही या चर्चासत्रात सहभागी झाले होते. पण उभय उमेदवार एकत्र आले नाहीत. देवरा यांनी आधी भूमिका मांडली. ते निघून गेल्यावर आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले.

हेही वाचा >>> ‘व्होट जिहाद’विरोधात ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबईमध्ये महापालिकेव्यतिरिक्त १८ विविध प्राधिकरणे आहेत. मात्र नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महापालिकेलाच आणि महापौरांना अधिकार दिले पाहिजेत, असे मत यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईतील कोणत्याही गोष्टीची जबाबदारी महापालिकेवर टाकली जाते, पण त्या तुलनेत महापालिकेला अधिकार नाहीत, असे ते म्हणाले.

‘धारावी प्रकल्पाला विरोध नाही, पण…’

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबतही ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. या प्रकल्पासाठी संबंधित कंपनीला धारावीची ५४० एकर जागा दिली आणि मुंबईतील विविध ठिकाणच्या जमिनीही दिल्या आहेत. तसेच अधिमूल्यातून सवलतीही दिल्या आहेत. जास्तीचे चटई क्षेत्रफळ निर्देशांक दिले आहे. त्यामुळे धारावीतील रहिवाशांची संख्या दुप्पट, तिप्पट वाढणार आहे. एवढ्या लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता मुंबईत आहे का, असाही सवाल त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवरांकडून ‘लाडकी बहीण’चे कौतुक

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचे कौतुक केले. या योजनेवर विरोधकांकडून टीका होत असली तरी महिला या योजनेमुळे खूप आनंदी आहेत, त्यांच्या हातात पैसे आल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होत आहे, काही महिलांनी लहान व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे पैसे दिले तरी त्यामुळेही अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत असते, असेही ते म्हणाले.‘मनरेगा’ची योजना आली तेव्हाही अशीच टीका झाल्याच्या आठवणीला त्यांनी उजाळा दिला. मुंबईच्या भवितव्याचा विचार करताना यापुढे मुंबई महानगराचा विचार करूनच नियोजन करावे लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.