गुजरातमधील अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रोहन गुप्ता यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. वडिलांची नाजूक प्रकृती पाहता निवडणुकीतून माघार घेतल्याचं त्यांनी सांगितलं. गुप्ता हे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्तेही आहेत. काँग्रेसने १२ मार्च रोजी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. गुप्ता यांनासुद्धा उमेदवारी देण्यात आली होती. या यादीत गुजरातमधील सात उमेदवारांची नावे होती. खरं तर काँग्रेस पक्षासाठी हा दुहेरी धक्का आहे. कारण पक्षाने बराच विचारविनिमय करून आणि इतर सर्व वाद बाजूला ठेवून त्यांची निवड केली होती. आता त्यांच्या जागी दुसरा उमेदवार मिळणे पक्षाला कठीण जाणार आहे. त्यांना दोन वर्षांपूर्वी सोशल मीडिया टीमच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळच्या व्यक्तीशी त्यांच्या कुटुंबाचे संबंध जगजाहीर झाले होते. १२ मार्च रोजी काँग्रेसने त्यांच्या नावाची घोषणा केल्यापासून सर्व काही आनंदात चालले होते. परंतु पक्षाला भूतकाळाचा विसर पडताना दिसत होता. माघार घेण्यापूर्वी गुप्ता यांनी बापूनगरमध्ये त्यांच्या पहिल्या जाहीर सभेसाठी बुधवार निश्चित केला होता. २३ मार्च रोजी त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आणि त्यांच्या मोहिमेला धार देण्यासाठी १०० सदस्यांची टीम तयार करण्यात आली.

रोहन गुप्ता यांचे नाव मागे घेण्याचे कारण काय?

गुप्ता यांनी X वर गुजरात काँग्रेसचे प्रमुख शक्ती सिंह गोहिल यांना लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे. गुप्ता यांचे वडील राजकुमार हेदेखील ४० वर्षांपासून काँग्रेसचे सदस्य आहेत. गोहिल यांच्याकडे राजीनामाही पाठवला आहे. राजकुमार यांनी २० वर्षांपूर्वी अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. नाव मागे घेतल्यानंतर आणि वडिलांच्या राजीनाम्याची माहिती मिळाल्यानंतर गुप्ता म्हणाले की, वडिलांची प्रकृती खालावली आहे. काल मी एका बैठकीत होतो, तेव्हा त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे ऐकले. मी त्यांना फोन केला आणि मला लढू द्या, ही माझ्या प्रतिष्ठेची बाब आहे, असे सांगितले. पण ते माझ्यावर ओरडले आणि बेशुद्ध पडले. राजकुमार १६ मार्चपासून आयसीयूमध्ये दाखल आहेत.

काँग्रेसने आपले पाच आमदार गमावले

काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्यावर केलेल्या हल्ल्यावर रोहन गुप्ता म्हणाले की, कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. माझे वडील ४० वर्षे काँग्रेस पक्षात होते आणि मी १५ वर्षे काँग्रेस पक्षाची सेवा करीत आहे. मी माझे काम पूर्ण बांधिलकीने केले आहे. काँग्रेस पक्ष आधीच एकाकी पडलेला दिसतो. २२ डिसेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने १७ पैकी ५ आमदार गमावले आहेत, असंही त्यांनी सांगितले. राजकुमार यांनी जाहीरपणे उमेदवारी मागे घेण्याऐवजी त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असंही वलसाडचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते गौरव पंड्या म्हणालेत.

योग्य उमेदवार वेळेवर मिळण्याची पक्षाला पूर्ण खात्री नसल्याचंही पक्षाने कबूल केले आहे. गुजरातसह अन्य राज्यांतील उर्वरित जागांवर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी दिल्लीत झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीतही कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने गुजरातचे माजी प्रमुख अर्जुन मोधवाडिया यांचे उदाहरण दिले. पक्ष दिवसेंदिवस मोठी नावे गमावत चालला आहे. मोधवाडिया यांच्यासारखा कोणी नेता भाजपामध्ये जाईल, असे कोणालाही वाटले नसेल. खरं तर त्यांना आता पोरबंदर पोटनिवडणुकीचे तिकीटही मिळू शकते. तसेच भाजपावाले त्यांना मंत्रिपदही देऊ शकतात, असंही त्या नेत्याने सांगितलं.

गुजरातमध्ये पक्षाची कामगिरी घसरण्यासाठी याला काँग्रेसच जबाबदार आहे. मोधवाडिया भाजपामध्ये जाण्यापूर्वी त्यांची कोणीही मनधरणी केली नाही. ज्या दिवशी त्यांनी पक्ष सोडला, तेव्हा पंड्याने इंस्टाग्रामवर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना टॅग करत एक पोस्ट केली होती. जेव्हा नेतृत्व गुणवत्तेला महत्त्व देते आणि वैयक्तिक पसंती-नापसंतीच्या आधारे कार्यकर्त्यांना दूर लोटते तेव्हा संस्थेचे नुकसान होते, असंही त्यात म्हटले होते.

रोहन गुप्तांच्या वडिलांचाही पराभव झाला होता

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, राजकुमार यांना असेही वाटत होते की, २००४ च्या लोकसभा निवडणुकीत अहमदाबाद पूर्वमधून त्यांचा पराभव काही अंशी अंतर्गत गटबाजीमुळे झाला होता. पक्षातील ज्यांना त्यांनी मदत केली, त्यांनीच त्यांना खाली खेचले आणि त्यांचा पराभव निश्चित केला, असे ते नेहमीच म्हणायचे. रोहनबरोबरही तसंच व्हावे, असे त्यांना वाटत नव्हते. राजकुमार भाजपाचा बालेकिल्ला असलेली जागा जिंकण्याच्या जवळपासही नव्हते. भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री हरिन पाठक यांनी त्यांचा तेव्हा ७७,६०५ मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने सांगितले की, राजकुमार यांची भीती चुकीची नाही. २००१ मध्ये जेव्हा काँग्रेसने अहमदाबाद महानगरपालिका पहिल्यांदा ताब्यात घेतली, तेव्हा राजकुमार म्युनिसिपल स्कूल बोर्डाच्या निवडणुकीला उभे होते. मात्र प्रतिस्पर्धी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. त्यांना आपल्या मुलाबद्दलही अशीच भीती होती.

रोहन गुप्ता कोणत्या वादाला सामोरे गेले?

सनबर्ड्स इन्फ्राबिल्डमध्ये त्याची पत्नी योगिता आणि भाऊ अर्पण हे भागीदार असल्याचा रोहन गुप्ता यांनी जून २०२२ मध्ये सामना केला होता. अमित शाह यांच्या जवळची कंपनी ज्याचे प्रवर्तक अजय पटेल होते. २०१८ मध्ये अजय पटेल यांनी अमित शाह यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचा आरोप होता. अमित शाह हेदेखील त्यापैकी एक होते. आपल्या मुलाला तिकीट दिल्यानंतर राजकुमार चिंतेत होते. त्याच्याबरोबरही पुन्हा तेच घडू नये, असे त्याच्या वडिलांना वाटत असणार, असंही गुजरात काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.