छत्रपती संभाजीनगर, नांदेड : नांदेड येथे ३० गुन्हे नोंदविण्यात आलेले अन्वर अली खान यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश देण्यात आल्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी करण्याचा जाहीर सल्ला दिला. त्यानंतर अन्वर यास राष्ट्रवादीतून काढण्यात आल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. मात्र, ही कारवाई करताना भाजपमध्येही ‘ मटका ’ चालविणाऱ्यांना प्रवेश दिला गेल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

संतोष बोनलेवाड असे त्या भाजप कार्यकर्त्यांचे नाव आहे. भाजपमध्ये अनेक जण मटका चालवतात, असे चिखलीकर यांनी ‘ लोकसत्ता’ शी बाेलताना सांगितले.

मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी १८ जुलै २०२३ मध्ये सय्यद फिरोन मोहम्मद , लक्ष्मण गोविंद पोतलवाड, संतोष मारोती बोनलेवाड आणि शेख बद्रू यासीन हे चौघे मुखेड व परिसरात मटका व आयपील सट्टा चालवत असल्याची तक्रार केली होती. या व्यावसायातून करोडो रुपयांची बेहिशेबी मालमत्ता कमावली असून या माफियांवर वारंवार तक्रारी करुनही पोलीस कारवाई करत नाहीत, अशी तक्रार केली होती. या तक्रारीची खातरजमा करुन कार्यवाही करावी असा शेरा देवेंद्र फडणवीस यांनी त्या पत्रावर दिला होता. आता या तक्रारीतील संतोष बोनलेवाड यास भाजपने प्रवेश दिला आहे. भाजपमधील केवळ एकच कार्यकर्ता असे मटका चालविण्याचे काम करतो असे नाही तर अनेकजण यात गुंतले असल्याचा आरोप चिखलीकर यांचा आरोप आहे.

अन्वर अली खान यास राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर खासदार चव्हाण यांनी चिखलीकरांचे नाव न घेता कानउघाडणी करण्याचा सल्ला अजित पवार यांना दिला होता. त्यानंतर चिखलीकर यांनी मंगळवारी अन्वर अली खान यास पक्षातून काढून टाकत असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, ‘ ज्याला प्रवेश दिला होता त्याला काढून टाकले आहे. त्याची शिफारस करणाऱ्यालाही काढून टाकले आहे. राष्ट्रवादीमध्ये अनेक मान्यवरही प्रवेश करत आहेत. त्यामुळे काहीजणांची पोटदुखी वाढलेली असू शकते. सध्या भाजप कोण चालवते हे मला माहीत नाही. पण भाजपमध्येही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना प्रवेश दिले आहेत. ज्यांच्या गुन्हेगार म्हणून लेखी तक्रारी झाल्या आहेत, अशांना भाजपमध्ये स्थान देण्यात आले आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू होताच. आता या संघर्षाला ‘ एक गुन्हेगार तुमचा, एक गुन्हेगार आमचा ’ असे वळण मिळाले असल्याचे दिसून येत आहे.