प्रबोध देशपांडे

अकोला : राजकीय प्रयोगाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आपल्या विचारधारेच्या प्रवाह विरोधात डाव टाकला आहे. संघ परिवाराची पार्श्वभूमी असलेले डॉ. अभय पाटील यांच्या गळ्यात काँग्रेसने उमेदवारीची माळ टाकली. यावरूनच वंचित आघाडीने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. काँग्रेस उमेदवाराची संघ परिवाराशी नाळ जुळली असल्याने हा मुद्दा आता अकोला लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवाराच्या विचारसरणीला काँग्रेसने कायम कट्टर विरोध केला. अकोल्यात मात्र त्या उलट चित्र दिसून येते. यावेळेस काँग्रेसने मराठा कार्ड खेळले आहे. लोकसभेसाठी इच्छूक असलेल्या डॉ. अभय पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता. मात्र, त्यावेळी काँग्रेसने त्यांच्याऐवजी अकोल्यात मुस्लिम उमेदवार दिला. त्यांनी आताही लोकसभेची तयारी करून पक्षाकडे दावा केला. उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच त्यांच्या संघ परिवाराच्या पार्श्वभूमीचा मुद्दा पक्षांतर्गत वरिष्ठांकडे मांडण्यात आला होता. मात्र, काँग्रेसने दुर्लक्ष केले. वंचित व ‘मविआ’ एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांच्यावरच विश्वास दाखवला.

आणखी वाचा-Loksabha Election 2024: गरीब कुटुंबांना एक लाख रुपये ते ३० लाख युवकांना नोकरी, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने कोणती?

डॉ. अभय पाटील यांचे वडील डॉ. के. एस. पाटील हे विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष होते. अयोध्या येथे त्यांनी कारसेवा देखील केली होती. डॉ. अभय पाटील यांनी वैद्यकीयप्रमाणे आपल्या वडिलांचा वैचारिक वारसा देखील जोपासला. डॉ. अभय पाटील यांचा संघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांशी निकटचा संबंध राहिला. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांनी आपली विचारधारा कायम ठेवल्याचा आरोप होत आहे. संघाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी हजेरी लावली. समाजमाध्यमांच्या खात्यावर डॉ. अभय पाटील यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि शिस्त’ याचा अभिमान असल्याची पोस्ट टाकली होती. वंचित आघाडीकडून आता तीच पोस्ट प्रसारित करून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले जात आहे. या मुद्द्यावरून वंचितने काँग्रेसला कोडींत पकडले. वंचित आघाडीने आपल्या ‘एक्स’ खात्यावरून काँग्रेससह नाना पटोले यांना लक्ष्य केले आहे.

राजकीय प्रयोगासाठी अकोला जिल्हा प्रसिद्ध आहे. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग करून अकोला जिल्हा परिषदेवर गेल्या दोन दशकांपासून सत्ता कायम ठेवली. विधानसभांच्या काही निवडणुकांसह काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभेत देखील दोन वेळा यश मिळवले. काँग्रेसने देखील गत साडेतीन दशकांमध्ये अकोल्यात विविध प्रयोग करून आपल्या पराभवाची मालिका खंडित करण्याचे प्रयत्न केले. आता संघ परिवाराशी निगडीत उमेदवार देऊन काँग्रेसने नवा प्रयोग केला आहे. तो यशस्वी होतो का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

आणखी वाचा-सनातन धर्म, राम मंदिर आणि भाजपाचीच भाषा; गौरव वल्लभ यांनी अचानक का सोडला काँग्रेस पक्ष?

वंचितची कमजोर स्थिती असल्याने ते वैयक्तिक टीका करीत आहे. एकीकडे त्यांची भाजप व संघाला हरवण्याची भाषा असते आणि अकोल्यात ते काँग्रेसला विरोध करतात. त्यामुळे भाजपसाठी पोषक वातावरण तयार होते. माझा तो भूतकाळ असून ती विचारधारा मी कधीच सोडली आहे. -डॉ. अभय पाटील, काँग्रेस उमेदवार, अकोला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वंचितने काँग्रेसच्या दोन उमेदवारांना पाठिंबा दिल्यावरही अकोल्यात त्यांनी विरोधात उमेदवार दिला. काँग्रेसने ॲड.आंबेडकर यांना पाठण्याचा प्रयत्न नेहमीच केला. नाना पटोले यांना संघ स्वयंसेवक सोडून दुसरा उमेदवार मिळाला नाही का? हा प्रश्न आहे. नाना पटोलेंचा खरा चेहरा समोर आला आहे. -डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष, वंचित आघाडी.