बिपीन देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात मराठवाड्यात आंदोलनाची धार अधिक टोकदार होत असून यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस पक्ष अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र संभ्रमावस्थेत असून त्यांनी आक्रमकतेऐवजी आस्ते कदम भूमिका घेत महागाई, बेरोजगारी आदी मुद्दे पुढे करत आंदोलनाचे “संमिश्र” स्वरूप ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.

मराठवाड्याच्या नांदेड व हिंगोली जिल्ह्यातून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येऊन गेल्यानंतर विभागातील काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. कॉंग्रेसकडून होणाऱ्या आंदोलनात आता बऱ्यापैकी गर्दीही दिसून येत आहे. काँग्रेसचा गड मानला जात असलेल्या नांदेड, हिंगोलीत राज्यपालांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली. नांदेडमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेच आंदोलनात उतरलेले दिसून आले. मात्र, नांदेडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना थंडच असल्याचे चित्र आहे.हिंगोलीतही माजी आमदार भाऊ गोरेगावकर आदी काँग्रेस नेते राज्यपालांविरोधातील आंदोलनात उतरून आक्रमक झालेले दिसून आले. जालन्यात ७ डिसेंबर रोजी बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात भाजप व बाळासाहेबांची शिवसेना वगळता अन्य काही पक्ष, शिवप्रेमी, मराठा संघटना उतरल्या आहेत.

हेही वाचा: दादा भुसेंच्या पुत्राच्या वाढदिवस फलकांनी भाजप अस्वस्थ

लातूरमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. यामध्ये कोणत्याही एका पक्षाने पुढाकार घेतल्याचे चित्र नव्हते. मात्र, काँग्रेस पुढे आणि सोबतच शिवप्रेमी संघटना, असेच चित्र होते. औरंगाबादमधील कन्नड, पिशोरमध्ये राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून एक दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. यानिमित्ताने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना त्यांच्या विकासमहर्षी रायभान जाधव समितीच्या वतीने बंदची हाक देत आंदोलनात उतरता आले.औरंगाबादेतही काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. शिवसेनाही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यपालांच्या वक्तव्याच्या आडून भाजपविरोधात आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी राज्यपालांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मुद्यावरही शिवसेनेने आक्रमक होत मराठवाड्यात रास्ता रोको करून ठिकठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

हेही वाचा: श्रीशैल्य उटगे : ग्रामीण जनतेचा आवाज

विविध शिवप्रेमी संघटनाही राज्यपालांच्या विधानाविरोधात आक्रमक रस्त्यावर उतरल्या आहेत. शिवप्रेमी, मराठा संघटनांनी जालना, औरंगाबादेत बैठक घेऊन आंदोलन तीव्र करण्याची रणनीती आखली आहे. या वातावरणात राष्ट्रवादीकडून जपून पाऊले टाकण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे हिंगोलीतील आंदोलनाच्या तुलनेत अन्य ठिकाणच्या निषेधाला अपेक्षित धार दिसून आली नाही. हिंगोलीत काळ्या टोपीत कांदे टाकून आंदोलन करण्यात आले. औरंगाबादेतील आंदोलनाकडे संपर्कप्रमुख राजेश टोपे व स्थानिक नेते तथा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पाठ फिरवल्याचे आढळून आले. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात तेव्हा मंचावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे उपस्थित होते आणि त्यांनी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यानंतर फारशी प्रतिक्रिया दिलेली नसल्यामुळेही राष्ट्रवादी चाचपडत असण्याची शक्यता आहे. मात्र, शिवप्रेमी संघटना आक्रमक होत असल्यामुळे आता सर्वांचा सहभाग असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीही आपला राज्यपालविरोधाचा सूर आळवत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress has aggressive in agitation against governor in marathwada aurnagabad and ncp has started a similar form of agitation print politics news tmb 01
First published on: 04-12-2022 at 12:19 IST