सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात हरवत चाललेले स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कशीबशी धडपड करणारा काँग्रेस पक्ष आणखी विकलांग झाला आहे. तब्बल सात दशके काँग्रेसबरोबर राहिलेल्या अक्कलकोट तालुक्यातील दुधनीच्या म्हेत्रे कुटुंबीयांनी पक्षाशी असलेली नाळ तोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्यासमोर अन्य कोणताही पर्याय नव्हता. प्रचंड अडचणीत आलेला स्वतःचा साखर कारखाना, ऊसउत्पादक शेतकऱ्यांची वाढलेली देणी, इतर व्यवसायाकडे सरकारची वक्रदृष्टी, कार्यकर्त्यांच्या अडचणी अशा चोहीबाजूंनी होणारा कोंडमारा सहन करणे अशक्य होते. या अगतिकतेतून म्हेत्रे यांना स्वतःचे उरलेसुरले अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेस पक्षाची साथ सोडावी लागली. परंतु सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटात म्हेत्रे यांनी प्रवेश केला असला तरी स्थानिक पातळीवर सूत जमणे कठीण असल्याचे मानले जाते. तसे संकेतच भाजपचे स्थानिक आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वटवृक्ष श्री अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने संपूर्ण राज्यासह आसपासच्या पर्यटन नकाशावर आलेल्या अक्कलकोट हे एकीकडे अध्यात्म आणि भक्तिपीठ म्हणून ओळखले जात असताना दुसरीकडे दुर्देवाने या धार्मिक पर्यटन क्षेत्रात गुन्हेगारी आणि रक्तरंजित राजकारणाचाही प्रत्यय येतो. या तालुक्यातील शहराचे ठिकाण असलेल्या दुधनीचे नगराध्यक्ष म्हणून सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी सुमारे पाच दशकांहून अधिक काळ मोठा दरारा निर्माण केला होता. त्यांचे पुत्र असलेले माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनीही चारवेळा आमदारकी आणि दोनवेळा राज्यमंत्रिपद सांभाळत अनेक वर्षे अक्कलकोटच्या राजकारणात पकड बसविली होती. मात्र अलिकडे या तालुक्यात भाजपने दबदबा निर्माण केला आहे.
दहा वर्षांपूर्वी त्यांच्याच मांडीला मांडी लावून वावरणारे भाजपचे सचिन कल्याणशेट्टी हे आता म्हेत्रे यांना वरचढ ठरले आहेत. म्हेत्रे यांचा स्थानिक विधानसभा निवडणुकीत सलग दोनवेळा मोठ्या मतफरकाने पराभूत केलेले तरूण रक्ताचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मर्जीतील ओळखले जात असल्यामुळे जिल्हा प्रशासनातही त्यांच्या शब्दाला मोठे वजन निर्माण झाले आहे. किंबहुना पालकमंत्र्यांच्या नंतर आमदार कल्याणशेट्टी यांचीच चलती असल्याचे सांगितले जाते. दक्षिण सोलापूरचे आमदार, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या तालमीत तयार झालेले आमदार कल्याणशेट्टी हे अलिकडे आपल्या गुरूला ही वरचढ ठरल्याचे मानले जाते. वीरशैव लिंगायत समाजाअंतर्गत राजकारणात सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे दोघेही एकमेकांना पाण्यात पाहत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजपच्या बदलत्या राजकारणात एरव्ही, गेली दहा वर्षे एकमेकांशी शह-काटशहाचे राजकारण करणारे आणि एकमेकांपासून नेहमीच फटकून वागणारे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना परवाच्या सोलापूर कृषिउत्पन्न समितीच्या निवडणुकीत एकत्र येणे भाग पडले. कारण आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दोन्ही देशमुखांना डावलून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने आणि काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याबरोबर मैत्री करून आपले पॅनेल उभे केले. त्यांच्या विरोधात दोन्ही देशमुखांनी दंड थोपटले खरे; परंतु काँग्रेस नेत्यांची तगडी ताकद सोबत घेऊन आमदार कल्याणशेट्टी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाममुद्रा वापरून वेगळी खेळी खेळली. परिणामी, इकडे काँग्रेसमध्ये दिलीप माने व सुरेश हसापुरे यांच्या भूमिकेमुळे दुखावलेले अक्कलकोटचे नेते सिध्दाराम म्हेत्रे हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरोधात प्रतिक्रिया म्हणून थेट भाजपच्या दोन्ही देशमुखांना साथ दिली. परंतु अखेर आमदार कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे दिलीप माने व सुरेश हसापुरे यांनी कृषी बाजार समितीत सत्ता राखली. यात दिलीप माने हे सभापती झाले असले तरी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे त्यांचे नेते झाले.
या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली असताना दुसरीकडे कमकुवत काँग्रेसमध्येही पुन्हा फाटाफूट झाली. या संपूर्ण घडामोडींमध्ये अक्कलकोट तालुक्यातील आहे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या दैनंदिन उपद्रवी राजकारणामुळे वरचेवर त्रस्त झालेल्या सिध्दाराम म्हेत्रे यांना आपल्या साखर कारखान्यासह इतर अडचणीत आलेल्या संस्था वाचविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची फळी टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसची साथ सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा लागला. म्हेत्रे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून मदतीचा शब्द घेतल्याचे बोलले जाते. येत्या ५ जून रोजी अक्कलकोटमध्ये एकनाथ शिंदे व इतर पाच मंत्र्यांच्या उपस्थितीत म्हेत्रे यांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यातून म्हेत्रे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालविली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. म्हेत्रे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करणार असतील आणि यापुढेही हिंदुत्ववादी विचारांची भूमिका घेणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. परंतु स्वतःच्या अडचणीत आलेल्या संस्था व इतर धंदे व्यवसायाला सत्तासंरक्षण मिळण्यासाठी त्यांचा शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीमध्ये येण्याचा खटाटोप राहणार असेल तर ते आपण कदापि मान्य करणार नाही, आपला संघर्ष सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा आमदार कल्याणशेट्टी यांनी दिला आहे. म्हेत्रे यांनी ‘ दुश्मनी से दोस्ती भली ‘ अशा शब्दांत आपले प्रतिस्पर्धी आमदार कल्याणशेट्टी यांच्यापुढे झाले गेले विसरून मैत्रीचा हात पुढे केला आहे. परंतु या मैत्रीचे नवे पर्व अनुभवायला मिळणार की पारंपरिक सत्तासंघर्ष सुरूच राहणार, याची सार्वत्रिक उत्सुकता अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे.