Swatantryaveer Savarkar centre at Mumbai University : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा मंगळवारी केली. हिंदुत्ववादी विचारवंत म्हणून वीर सावरकरांचा महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या सरकारांनी यापूर्वीही गौरव केलेला आहे. परंतु, सावरकरांवर आधारित अभ्यास व संशोधन केंद्र उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने या केंद्रासाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच मुंबई विद्यापीठाच्या परिसरात सावरकरांचा पुतळा उभारण्याचेही सरकारचे ध्येय आहे.
भारतीय तरुणांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या वीर सावरकरांची ‘बीए’ आणि ‘बॅरिस्टर’ ही पदवी ब्रिटिशांनी काढून घेतली होती. त्यापैकी ‘बीए’ची पदवी मुंबई विद्यापीठाने परत केली आहे. मात्र, सावरकरांचा सन्मान असलेली ‘बॅरिस्टर’ ही पदवी अजूनही परत मिळालेली नाही. ती परत मिळविण्यासाठी इंग्लंडमधील प्रशासनाशी आवश्यक पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
वीर सावरकरांचे अभ्यास व संशोधन केंद्र कसे असेल?
महायुती सरकारकडून कलिना कॅम्पसमध्ये उभारण्यात येणारे अभ्यास व संशोधन केंद्र हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र, साहित्य, भाषणे आणि इतर उपलब्ध सामग्रीचे दस्तऐवजीकरण, संरक्षण व संग्रह करेल; तसेच त्यांचा प्रसार करेल. या केंद्रात सावरकरांवरील अभ्यासासाठी विविध अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात येतील. ज्यामध्ये प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवीचा समावेश असेल.
आणखी वाचा : एका घोटाळ्याप्रकरणी जामीन तोच दुसऱ्या घोटाळ्याप्रकरणी अटक, काय आहे हा नाट्यमय घटनाक्रम?
यासंदर्भात माहिती देताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, वीर सावरकरांचे हे केंद्र विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संशोधकांना सामाजिक सुधारणा, स्वातंत्र्य आणि राष्ट्रचिंतनाशी संबंधित विचारांचा अभ्यास करण्यासाठी सक्षम करेल. या केंद्राच्या माध्यमातून आम्ही समान विचारांवर अभ्यासपूर्ण चर्चा आणि वादविवाद घडवून आणत जागतिक बौद्धिक व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न करू.”
मुंबई विद्यापीठाशी वीर सावरकरांचा संबंध
स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वतः मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी होते. त्यांनी १९०६ मध्ये येथून कला शाखेची (Bachelor of Arts) पदवी प्राप्त केली होती. मात्र, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्यामुळे ब्रिटीश सरकारने १९११ मध्ये त्यांची ही पदवी काढून घेतली. १९६० मध्ये नंतर ती बहाल करण्यात आली. प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, २०२२ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या नामवंत माजी विद्यार्थ्यांवर संशोधन करत असताना सावरकर यांचे केंद्र स्थापन करण्याची कल्पना उदयास येऊ लागली आहे.
मुंबई विद्यापीठातील अन्य अभ्यास केंद्रे
मुंबई विद्यापीठाने यापूर्वीही प्रख्यात व्यक्तिमत्त्वांवर आधारित अभ्यास व संशोधन केंद्रे स्थापन केली आहेत. २०२० मध्ये विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय संशोधन केंद्राची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी सरकारकडून जवळपास एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. २०१९ मध्ये तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विद्यापीठात प्राध्यापक बाळ आपटे विद्यार्थी व युवक चळवळी अभ्यास केंद्राच्या पायाभरणी समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. २००६ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात राजीव गांधी यांचे समकालीन अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली.
सध्या या केंद्रांची काय स्थिती आहे?
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय संशोधन केंद्र हे फक्त कागदावरच अस्तित्वात आहे, कलिना कॅम्पसमध्ये या संशोधन केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली असली तरी त्याचे प्रत्यक्ष बांधकाम व कार्य सुरू झालेले नाही. विद्यापीठात राजीव गांधी यांच्या समकालीन अभ्यास केंद्राची एक इमारत आहे आणि तिथे काही अभ्यासक्रमही चालवले जातात, परंतु हे केंद्र व्यवस्थित चालवले जात नाही, असं विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राध्यापक बाळ आपटे विद्यार्थी व युवक चळवळी अभ्यास केंद्र मात्र सक्रिय असून सुरळीत चालत आहेत. अलीकडेच त्यासाठी अध्यापन व बिगर-अध्यापन कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरातीही दिल्या गेल्या आहेत.
वयाच्या २७ व्या वर्षी सावरकरांना अटक
इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटीश सरकारविरोधात लढा देण्याचे नियोजन करणाऱ्या इतर भारतीयांमध्ये सामील झाले. या क्रांतिकारी कृतीमुळे मार्च १९१० मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी त्यांना ब्रिटिशांनी अटक केली. तेथून भारतात परत पाठवले जात असताना वीर सावरकरांनी फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ जहाजातून समुद्रात उडी घेतली आणि पोहत पोहत ते तिथल्या किनाऱ्यावर पोहोचले. या घटनेची जगभर चर्चा झाली; पण काही काळातच सावरकरांना पुन्हा अटक करण्यात आली.
हेही वाचा : भाजपाच्या मंत्र्याचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; सरकार अडचणीत? नेमकं काय आहे प्रकरण?
वयाच्या २८ व्या वर्षी वीर सावरकरांना दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अंदमानातील सेल्युलर तुरुंगात पाठविण्यात आले. तिथे सावरकरांना प्रचंड छळ आणि अमानुष वागणूक सहन करावी लागली. १९२४ मध्ये वादग्रस्त क्षमायाचना आणि राजकारणात सहभागी न होण्याच्या आश्वासनानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. १९३७ मध्ये अहमदाबाद येथील कार्यक्रमात हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सावरकरांच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू झाला. १९४३ पर्यंत त्यांनी या पदावर काम केले.
महात्मा गांधींच्या हत्येनंतर सावरकरांवर आरोप
जानेवारी १९४८ मध्ये नथुराम गोडसे याने (हिंदू महासभेचा सदस्य) महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येचा आरोप वीर सावरकरांवरही ठेवण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. तेव्हापासून सावरकर हे भाजपासाठी एक प्रमुख आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व राहिले आहेत. २००३ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात वीर सावरकरांचे जीवनचरित्र प्रकाशित करण्यात आले. फेब्रुवारी २००३ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचे पोर्ट्रेट (छायाचित्र) लावण्यात आले. त्यावेळी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.