नागपूर : भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण देशात ‘मोदींके ११ साल-बेमिसाल’ अभियान जोरात राबवण्यात येत असताना नागपुरात मात्र पक्षाच्याच एका आमदाराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रीपदाला अकरा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वत:च्या मतदारसंघात गडकरींची जाहीर सभा घेतली. त्यात केंद्र सरकारच्या योजनांसोबतच गडकरींनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. मोदींसोबतच गडकरीही बेमिसाल असे या कार्यक्रमाचे थोडक्यात स्वरुप होते.
पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे कट्टर गडकरी समर्थक म्हणून ओळखले जातात. २०१४ मध्ये प्रथम युतीचे सरकार आले तेव्हा गडकरी मुख्यमंत्री व्हावे म्हणून मोर्चेबांधणी करणाऱ्या विदर्भातील आमदारांमध्ये नागपुरातून खोपडे अग्रभागी होते. त्याची राजकीय किंमत ते अजूनही चुकवतच आहेत. पण त्यांनी गडकरींची साथ सोडली नाही. २०१४ नंतर झालेल्या २०१० आणि २०२४ या दोन लोकसभा निवडणुकीत गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्य हे खोपडेंच्याच पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून मिळाले. त्यामुळे गडकरींचाही खोपडेवर जीव आहे.
केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री म्हणून गडकरी यांनी सर्वाधिक निधी पूर्व नागपूरमध्ये खर्च केला. कधीकाळी विकासात मागे पडलेले पूर्व नागपूर आज शहरातील सर्वात विकसीत मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. तब्बल ११ उड्डाणपूल गडकरींनी या मतदारसंघात बांधले. केंद्राचा स्मार्ट सिटी प्रकल्प, सिम्बॉयसिस ही आतराष्ट्रीय शैक्षणिक संस्था ही गडकरींमुळेच खोपडेंच्या मतदारसंघात सुरू होऊ शकली. त्यामुळे मोदींचे अकरा वर्ष यापेक्षा गडकरींचे मंत्री म्हणून ११ वर्ष खोपडेंसाठी अधिक महत्वाचे ठरते. त्यामुळेच त्यांनी ‘मोदी के ११ साल-बेमिसाल’ चे निमित्त साधत त्याच धर्तीवर गडकरी यांना मंत्री म्हणून ११ वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांची विजयनगर, कळमना भागात जाहीर सभा आयोजित केली होती.
सभेला उसळलेली गर्दी खोपडेंची त्यांच्या मतदारसंघावर असलेली पकड दर्शवणारी होती. ‘११ साल – बेमिसाल – संवाद सभा’ असा फलक व्यासपीठावर लावण्यात आला होता. मोदींचे छायाचित्र त्यावर होते. खुद्द गडकरी यांनी त्यांच्या भाषणात मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या धाडसी निर्णयाचा उल्लेख भाषणात केला. मात्र खोपडे यांनी मंत्री म्हणून गडकरी यांनी अकरा वर्षात केलेल्या कामांचाच लेखाजोखा मांडला.
काय म्हणाले खोपडे?
खोपडे म्हणाले, काँग्रेसच्या ५० वर्षाच्या राजवटीत जी कामे पूर्व नागपुरात होऊ शकली नाहीत ती कामे ११ वर्षात गडकरी यांच्या माध्यमातून झाली. स्मार्ट सिटी, पार्डी उड्डाणपुलामुळे सर्वसामान्यांची सोय झाली. तब्बल ११ उड्डाणपूल पूर्व नागपुरात बांधण्यात आले त्यामुळे वाहतुकीची समस्या सुटली. खोपडे यांनी या सर्व कामांचे श्रेय गडकरींना दिले.