गुजरातमधील सुरत मतदारसंघामध्ये बिनविरोध निवडणूक होऊन भाजपाचा उमेदवार निवडून आल्यानंतर बरीच चर्चा झाली. ३० वर्षांपासून या राज्यात भाजपाचे प्राबल्य आहे. मात्र, आता गुजरात राज्य आणखी एका कारणासाठी विशेष चर्चेत आले आहे. २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये गुजरात राज्यात फक्त बहुजन समाज पार्टी या एकाच राष्ट्रीय पक्षाने मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनेही या राज्यामध्ये मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी देण्याचे टाळले आहे.

गुजरातमध्ये एकूण २६६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी एकूण ३२ उमेदवार हे मुस्लीम आहेत. उद्या मंगळवारी (७ मे) गुजरातमध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले बहुसंख्य मुस्लीम हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत; तर इतर काही मुस्लीम उमेदवार हे छोट्या पक्षांकडून उभे आहेत. भारतीय जननायक पार्टी (खेडा), लोग पार्टी (नवसारी), राईट टू रिकॉल पार्टी (खेडा) व द सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (पाटन व नवसारी) या पक्षांनी मुस्लिम व्यक्तींना उमेदवारी दिली आहे.

गांधीनगर हा सर्वाधिक संख्येने मुस्लीम उमेदवार रिंगणात असलेला मतदारसंघ ठरला आहे. या ठिकाणी गृहमंत्री अमित शाह भाजपाकडून उभे आहेत; तर काँग्रेसकडून सोनल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भरुच व पाटन या दोन्ही मतदारसंघांतून चार मुस्लीम उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा : मुस्लिमांनी मतदान केले म्हणूनच योगी आदित्यनाथ दोनदा मुख्यमंत्री; टीडीपीच्या उमेदवाराचे वक्तव्य

गुजरातच्या एकूण लोकसंख्येपैकी १० टक्के मुस्लीम आहेत. जवळपास १५ मतदारसंघांमध्ये त्यांची लोकसंख्या तुलनेने अधिक आहे. त्यामध्ये कच्छ, जामनगर, जुनागढ, भरुच, भावनगर, सुरेंद्रनगर, पाटन, बनासकांठा, साबरकांठा, अहमदाबाद पश्चिम, अहमदाबाद पूर्व, गांधीनगर, नवसारी, पंचमहाल व आनंद या मतदारसंघांचा समावेश होतो.

काँग्रेसने भरुच मतदारसंघातून २००४ साली मोहम्मद पटेल, २००९ साली अजिज टंकारवी व २०१९ साली शेरखान पठाण या मुस्लीम उमेदवारांना रिंगणात उतरवले होते. भरुच हा काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा बालेकिल्ला होता. गुजरातमध्ये काँग्रेस आणि आपने युती केली आहे आणि या मतदारसंघातून इंडिया आघाडीचे प्रतिनिधित्व आप करणार आहे. ‘आप’ने या ठिकाणी विद्यमान आमदार चैतर वसावा यांना उमेदवारी दिली आहे.

२०१४ मध्ये काँग्रेसने भरुचमधून जयेश पटेल यांना उमेदवारी दिली होती; तर नवसारीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याविरोधात मुस्लीम उमेदवार दिला होता. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरातमधील सर्व २६ जागांवर भाजपाचेच उमेदवार विजयी ठरले आहेत. यावेळी सुरत मतदारसंघात बिनविरोध निवडणूक होऊन, भाजपाचा उमेदवार निवडून आला आहे. उर्वरित २५ जागांवर निवडणूक होणे बाकी आहे.

गुजरात विधानसभेतील काँग्रेसचे नेते व एकमेव मुस्लीम आमदार इम्रान खेडावाला यांनी पक्षाच्या या निर्णयाला समर्थन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, “पक्षाचा हा निर्णय योग्यच आहे.” १९५७ पासून १९८४ पर्यंत भरुच लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. १९७७ पासून १९८४ पर्यंत अहमद पटेल तीन वेळा याच जागेवरून खासदार राहिले होते. ते या जागेवरून निवडून येणारे काँग्रेसचे शेवटचे खासदार आहेत. १९८९ मध्ये भाजपाचे चंदूभाई देशमुख यांनी अहमद पटेल यांचा पराभव केला. त्यानंतरच्या निवडणुकीत या जागेवरून ते पुन्हा निवडून आले. त्यानंतर १९९८ मध्ये भाजपाच्या मनसुख वसावा यांनी त्यांची जागा घेतली. या वर्षी मनसुख वसावा या मतदारसंघातून सातवी निवडणूक लढवीत आहेत.

फैसल पटेल व मुमताज पटेल या अहमद पटेल यांच्या दोन्ही मुलांनी भरुचमधून तिकिटाची मागणी केली होती. त्याबद्दल काँग्रेसचे नेते खेडावाला म्हणाले, “ते इथून निवडून येण्याची शक्यता नाही. मात्र, आपचे चैतर वसावा हे इथले स्थानिक रहिवासी असून, विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या समाजाचे लोकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. या मतदारसंघामध्ये तीन लाख मुस्लीम मतदार आहेत. त्या सर्वांनी जरी मतदान केले तरी ते पुरेसे ठरत नाही. फक्त मुस्लीम मतांच्या आधारावर जिंकणे कठीण आहे. जिंकण्यासाठी हिंदू मतांचीही गरज आहे.”

हेही वाचा : अमेठी, रायबरेली आणि वायनाडबाबतच्या निर्णयातून काँग्रेसला नेमके काय साधायचे आहे?

एकाही राष्ट्रीय पक्षाने गुजरातमधून मुस्लिमांना उमेदवारी न दिल्याबद्दल मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाचे माजी कुलगुरू व इस्लामिक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरी सर्व्हिस प्लॅटफॉर्म पारसोली कॉर्पोरेशनचे मालक जफर सरेशवाला यांनी चिंता व्यक्त केली आहे. जफर सरेशवाला म्हणाले, “मुस्लिमांना तिकीटच दिले गेले नाही, तर ते या समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान कसे मिळवू शकतील? असा सवाल मी माझ्या समाजाला विचारत असतो. आतापर्यंत मुस्लीम समाजाला हे कळले आहे की, आपले काम हे फक्त मत देण्याचे असून, मत घेण्याचे नाही. दुर्दैवाने सध्या असेच काहीसे झाले आहे.” सरेशवाला एकेकाळी मोदींचे टीकाकार होते. मात्र, त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींना समर्थन देण्याची भूमिका घेतल्यावर त्यांच्यावरही टीका झाली होती. २००२ च्या गुजरात दंगलीमध्ये सरेशवाला यांचेही अतोनात नुकसान झाले होते. ते पुढे म्हणाले, “गुजरातमधील मुस्लिमांना अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी आहेत. २००२ नंतर मुस्लिमांनी शिक्षण, उद्योजकता व आरोग्य या तीन गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. उदाहरणार्थ- अहमदाबादमध्ये मुस्लिमांकडून निव्वळ तीन-चार शाळा चालवल्या जायच्या. आता ती संख्या ७२ वर गेली आहे. त्याचप्रमाणे २००२ च्या दंगलीत जळून खाक झालेल्या लहान उद्योगांची संख्याही आता १०-१५ पटींनी वाढली आहे. मुस्लीम समुदायाने देशातील सर्वोच्च नेत्यांवर टीका करू नये. तसेच नागरिकत्व सुधारणा कायदा अथवा कोणत्याही प्रक्षोभक वक्तव्यावर प्रतिक्रियाही देऊ नये, असा सल्ला मी समाजाला नेहमी देतो.”

मात्र, राजकारणाबाबत मुस्लीम तरुणांमध्ये असलेली उदासीनता सरेशवाला यांना खटकते. अधिकाधिक मुस्लिमांनी राजकारणात यायला हवे, असे सांगताना ते म्हणतात, “गुजरातमध्ये ३० वर्षांपासून भाजपा सत्तेत आहे. २०२२ पर्यंत मी, ग्यासुद्दीन शेख व जावेद पीरझादा असे आम्ही तिघे आमदार होतो; मात्र आता मी एकटाच उरलो आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील मुस्लिमांचे प्रश्न मला एकट्याला हाताळावे लागतात.”