सुहास सरदेशमुख

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चोहोबाजूंनी वेढण्याचा भाग म्हणून कधी आरोप करत तर कधी डोळ्यांत पाणी आणून अन्याय झाल्याची भावना माध्यमांसमोर मांडणारे आणि शिंदे गटात दाखल झालेले माजी मंत्री रामदास कदम यांनी मराठवाड्यातील आणि औरंगाबादमधील शिवसेनेत मात्र मराठा- मराठेतर या वादाला खतपाणी घातले, अशी आठवण शिवसैनिक सांगत आहेत. त्यांनी तत्कालीन खासदार व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात शिवसैनिकांना उतविले. ही प्रक्रिया सुरू असताना त्यांचे एमआयएमचे आमदार इत्मियाज जलील यांच्याशी मात्र सलोख्याचे संबंध होते, याची चर्चा औरंगाबादमधील शिवसैनिकांत सुरू झाली आहे. पुढे जलील हे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात विजयी ठरले आणि शिवसेनेची लोकसभेतील एक जागा घटली.

मुलगा आमदार योगेश कदम याच्यावर माजी मंत्री अनिल परब हे अन्याय करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणाऱ्या रामदास कदम यांची मराठवाड्यातील शिवसेनेची कारकीर्द कमालीची वादग्रस्त होती. कदम यांच्या माध्यमांमधील मुलाखतीनंतर त्यांचा औरंगाबाद जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा कालखंड आता शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून काम करताना रामदास कदम यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात मोहीम उघडल्यासारखे वातावरण तयार केले होते. सिद्धार्थ उद्यानातील हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील चित्रदालनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कार सोहळ्यात तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेतील नगरसेवकांच्या असंतोषाला खतपाणी घालताना रामदास कदम यांनी मराठा- मराठेतर अशी सरळ आखणी करायला सुरुवात केली. शिवसेनेत जातीची गणिते फारशी घातली जात नसत, पण कदम यांच्या पालकमंत्री पदाच्या कारकीर्दीत तो फरक जाणवू लागला. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना हाताशी धरून जिल्हाभर शिवसेनेत सरळ उभा वाद निर्माण करण्यात आल्याचे शिवसेनेतील एका गटाचे म्हणणे आहे. या काळात अगदी जिल्हा वार्षिक आराखड्यात होणारी नैसर्गिक वाढही जणू आपण राज्य सरकारकडून भांडून आणलेला निधी आहे, असेही कदम सांगत. एका जाहीर भाषणात तर त्यांनी ३५० कोटी रुपयांचा निधी कसा वाढविला असे सांगत ‘वाजवा टाळ्या’ असे म्हणण्याचा सपाटा लावला होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमध्ये आमदार इम्तियाज जलील यांचे म्हणणे आवर्जून ऐकले जायचे. औरंगाबाद मध्य मतदारसंघातील कामांनाही त्यांनी आवर्जून निधी दिला होता, अशी आठवण शिवसैनिक आता सांगू लागले आहेत.

 खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात वातावरण निर्माण करणारे कदम हे शिवसेनेचे हितचिंतक नाहीत, हे दाखविण्यासाठी चंद्रकांत खैरे यांनी नंतर अनंत गीते यांना एका मेळाव्यानिमित्त औरंगाबाद येथे खास आमंत्रण दिले. कोकणातील राजकारणात लोकसभा निवडणुकीत आपणास पराभूत करण्यासाठी रामदास कदम यांनी कसे प्रयत्न केले याचा पाढाच गीते यांनी औरंगाबादमधील शिवसैनिकांसमोर वाचून दाखविला. मात्र, ताेपर्यंत शिवसेनेतील दुभंग वाढला होता. तो मराठा व मराठेतर असा होत गेला. पुढे मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चाच्या निमित्ताने त्यात भरही पडत गेली. त्यातून जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांना पराभूत करण्यासाठी काम केले असल्याचेही आरोप झाले. अलीकडेच बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांच्या सार्वजनिक झालेल्या दूरध्वनीतूनही त्या आरोपांचा उल्लेख झाला. ज्या शिवसेनेत जातीपातीचे उल्लेख अभावानेच व्हायचे त्याचे उदात्तीकरण रामदास कदम यांच्या कार्यकाळात अधिक उघडपणे होऊ लागले होते. असा वादग्रस्त भोवताल असणारे रामदास कदम आता मात्र डोळ्यात पाणी आणून ‘मातोश्री’च्या चुका माध्यमांसमोर सांगत आहेत. त्यांची मराठवाड्यातील राजकीय कारकीर्दही तशीच केवळ वादग्रस्त नव्हे तर शिवसेनेची हानी करणारी होती याची चर्चा त्यानिमित्ताने शिवसैनिकांमध्ये सुरू झाली आहे.