अरवल येथील भाजपाचे माजी आमदार चितरंजन सिंह यांच्या दोन भावांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात एकूण ६ आरोपी आहेत त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. ३१ मे रोजी पटना येथील पत्रकार नगर परिसरात मोटार सायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्या दोघांना जवळून गोळ्या घातल्या होत्या. पोलिसांच्या सांगण्यानुसार या दुहेरी हत्याकांडाच्या तपासात काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. आता वेगळे झालेले पांडव सेनेचे संस्थापक चितरंजन सिंह आणि संजय सिंह त्यांच्यातील वादाचा बदला घेण्याचा संदर्भ या दुहेरी हत्याकांडाला असू शकतो.

पांडव सेनेची स्थापना

१९९२ मध्ये पाटण्यातील नीमा गावात बबलू सिंह, अशोक सिंह, बिपीन शर्मा, चितरंजन आणि संजय सिंह या पाच जमीनदार मित्रांनी पांडव सेनेची स्थापना केली. पांडव सेना ही उच्चवर्गीय समाजाची खाजगी सेना असल्याचा दावा त्यांच्याकडून केला गेला होता. भागातील नक्षलवादी कारवायांना उत्तर देण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली होती. नंतर मात्र पांडव सेनेचे रूपांतर खंडणी सेनेत झाले. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात पांडव सेनेने व्यापारी, डॉक्टर आणि वीटभट्टी मालकांमध्ये दहशत पसरवली होती. 

तपासात पांडव सेनेची पार्श्वभूमी महत्वाची

पाटणा येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार चितरंजनचे भाऊ शंभू आणि गौतम यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बबलू सिंह याने पोलिसांना सांगितले की ” गौतम नीना गावात येऊन आमची चेष्टा करत होता. सुधीर कुमार याच्या हत्येमागे चितरंजन याचा हात असल्याचा आरोप बबलू याने केला आहे”.  

वरिष्ठ पोलीस अधिक्षकांच्या म्हणण्यानुसार पांडव सेनेची पार्श्वभूमी आणि त्यांनी केलेला हिंसाचार हा या दुहेरी हत्याकांडाच्या तपासातील मुख्य धागा असणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय सिंहसह पाच आरोपींना अटक करण्यासाठी पोलीसांचे धाडसत्र सुरु आहे. पांडव सेनेने नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या मिळवल्या. मात्र कालांतराने पांडव सेना ही खंडणी सेना झाली. त्यानंतर टोळीतील सदस्यांचे आपापसात वाद सुरू झाले आणि पांडव सेना फुटली. २००४ मध्ये झारखंडमधील गढवा येथे बबलू सिंह आणि अशोक सिंह यांची हत्या करण्यात आली. तर तिसरा सदस्य बिपीन शर्मा काही महिन्यानंतर अपघातात ठार झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००४ मध्ये माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांचा नातु प्रशांत सहाय याची झारखंडच्या हजारीबाग येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या खटल्यात संजय सिंह हा आरोपी होता तर चितरंजन हा माफीचा साक्षीदार. त्यामुळेच संजय सिंह आणि चितरंजन या दोन पांडवसेनेच्या संस्थापकांमध्ये वैर आहे. तेव्हापासून या दोघांमध्ये आपसातील लढाया सुरू आहेत.