नागपूर: काहीही न करता एखाद्या कामाचा गाजावाजा करणे हा प्रचार तंत्राचा भाग मानला जातो. पण एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करून त्याचा साधा उल्लेखही न करणे खटकणारे ठरते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य अभिषेकाचे ३५० वे वर्ष राज्य शासनाने दणक्यात साजरे केले. राज्याच्या सांस्कृतिक खात्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवाजी महाराज घरोघरी पोहचवण्याचे काम केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी वातावरण निर्मितीसाठी हे अभियान सरकारने राबवले. पण प्रत्यक्षात भाजपच्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा दिसला नाही. एकाही नेत्याने प्रचारा दरम्यान हा मुद्दा लावून धरला नाही, साधा उल्लेखही केला नाही, याची खंत भाजपच्या काही नेत्यांनीच व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी निवडणुका पार पडल्या.आता निकालाची प्रतिक्षा आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत राज्यात झाली. महायुतीकडून प्रचारात महागाई, बेरोजगारी हे मुद्दे सोडून सर्व मुद्यांवर प्रचार करण्यात आला. अडिच वर्षातील कामांचा पाढा नेते वाचत होते. मात्र यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष साजरे करण्याचा मुद्दा कुठेच नव्हता. खरे तर राज्याच्या

हेही वाचा : भाजपाविरोधात पंजाबमधील शेतकर्‍यांचा रोष, तरीही दुप्पट मतांनी निवडून येण्याचा विश्वास; कारण काय?

सांस्कृतिक खात्याने या निमित्ताने अनेक उपक्रम राबवले. या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कामासाठी पुढाकार घेतला होता. प्रचाराच्या माध्यमातून ही कामे लोकांपुढे मांडली गेली असती तर त्याचा भाजपला निश्चित फायदा झाला असता. पण ते का झाले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराचा मुद्दा भाजपने प्रचारासाठी वापरला. भाजपमुळेच मंदिर शक्य झाले, असे या पक्षाचे नेते सांगू लागले. शिवराज्य अभिषेकाचा मुद्दाही किमान महाराष्ट्रात राम मंदिराप्रमाणेच आक्रमकपणेमांडता आला असता, मात्र भाजपने प्रचारात या मुद्याचा समावेश केला नाही. शिवाय पक्षाच्या जाहीरनाम्यात सुध्दा त्याला स्थान दिले नाही.

सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्य अभिषेकाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रतापगड येथील अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण सरकारने हटवले. आग्रा येथील किल्ल्यामध्ये १९ फेब्रुवारी २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिमाखात साजरी करण्यात आली. या वर्षी देखील भव्य सोहळा झाला. २ जून २०२३ ला रायगडावर साजरा झालेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा संपूर्ण जगाने अनुभवला. महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनच्या संग्रहालयातून भारतात आणण्याची जिद्द त्यांनी बाळगली. सातत्याने पाठपुरावा करून ब्रिटन सरकारसोबत त्यांनी सामंजस्य करार देखील केला. जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा येथे मराठा इन्फन्ट्री सैन्य दलाच्या सहकार्याने ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेसह छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात आला.

हेही वाचा : सर्वच पक्षांविरोधात गावकर्‍यांमध्ये रोष? डझनभर गावांनी टाकला निवडणुकीवर बहिष्कार; कारण काय?

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या श्रीशैलममध्ये तपश्चर्या केली, तिथे महाराजांचे एक छोटे मंदिर होते. सरकारने तिथे भव्यदिव्य मंदिर उभे केले. १९ फेब्रुवारी २०२४ ला पोंभुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले.याशिवाय रायगडावर शिवराज्याभिषेक मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी रायगड उत्सव समितीस भेट देणे, मुंबई येथे पुरातत्त्व विभागामार्फत आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, विशेष लोगोचे प्रसारण करून शासकीय कामकाजात त्याचा वापर, मंत्रालयात सूचना प्रणालीद्वारे महाराजांचे विचार दररोज ऐकण्यासाठी विशेष सिस्टिम इत्यादी उपक्रम सुरु केले. शिवाकालीन इतिहास जागृत व्हावा यासाठी टपाल तिकीट काढण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्यशस्त्र म्हणून घोषित केले . या सर्व बाबींचा महायुतीने नीट प्रचार केला नाही. एकही मोठा नेता यावर बोलला नाही, याबाबत खंत भाजपच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : “भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त” या वक्तव्याचा संबित पात्रा यांना पुरी मतदारसंघात फटका बसेल का?

” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्त आम्ही महानाट्य सादर करणार होतो. त्या दृष्टीने जनजागृती पण केली पण सांस्कृतिक विभागाने नागपुरात जाणता राजा नाटकाचे प्रयोग केल्यामुळे आमचा तो महानाट्याचा प्रयोग होऊ शकला नाही. भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश नसला तरी भाजपच्या सांस्कृतिक आघाडीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते मात्र लोकसभा निवडणुकीमुळे आम्ही कार्यक्रम करू शकलो नाही. मात्र येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर काही कार्यक्रम घेणार आहोत.”

अभिजित मुळे, अध्यक्ष, सांस्कृतिक आघाडी.नागपूर भारतीय जनता पक्ष