कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्र, आयुधांचा वापर केला जात आहे. कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जात विरोधी चळवळीला बळ मिळाले. याच शहरात आता धार्मिक – जाती पातीच्या गाठीभेटी घेऊन मतांची बेगमी केली जात आहे. सर्वच प्रमुख उमेदवारांनी जातीच्या प्रमुखांना, संस्थांना भेटी देऊन मतांची जुळवाजुळव चालवली असताना त्याला वादाची किनार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघात रणरणत्या उन्हात प्रचाराला गती आली आहे. यावेळी कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी असल्याने लढत लक्षवेधी ठरली आहे. त्यांच्या विरोधात शिंदे सेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी आव्हान दिले आहे. हातकणंगले मतदारसंघात शिंदेसेने खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर व वंचितचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील अशी चौरंगी लढत चुरशीची बनली आहे.

उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर आता सर्वच प्रमुख उमेदवारांनी प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. जाहीर सभा, कोपरा सभा, मेळावे, गाठीभेटी, पदयात्रा, बैठका यातून मतदारांना साद घातली जात आहे. निवडणुकीच्या काळामध्ये धार्मिक – जातीय गणिते उल्लेखनीय ठरत असतात. उमेदवार- मतदार यांची जातकुळी, उमेदवाराने माझ्या जाती- समाजासाठी काय केले ? असे मुद्दे प्रचाराच्या दृष्टीने निर्णायक ठरत असतात. यातून विविध धर्मीयांची आणि समाजाची मते मिळवण्यासाठी उमेदवाराची यंत्रणा जातीने राबत असते.

कोल्हापूर जिल्ह्यात हे चित्र यावेळीही ठळकपणे दिसत आहे. खरे तर कोल्हापूर ही पुरोगामी नगरी समजली जाते. सत्यशोधकीय चळवळीच्या माध्यमातून समतेवर आधारित समाजाची धारणा झाली पाहिजे या विचारसरणीचा सिद्धांत या नगरीत प्रभावीपणे मांडला गेला. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारण, बहुजन समाजाला शिक्षण , स्त्रीदास्य विमोचन अशा सामाजिक समतेच्या, कल्याणकारी कार्याची कृतिशील चळवळ उभी केली. या शहरात पुरोगामी विचारांच्या अनेक संघटना, नेत्यांनी जाती अंताची चळवळ उभी राहावी यासाठी अनेकदा मेळावे, परिषदा, अधिवेशने पार पडली. इतके झाले असले तरी या पुरोगामी चेहऱ्याच्या शहरांमध्ये धार्मिक – जातीयता या तत्वांना बळकटी मिळू लागली आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या उजव्या पक्षांनी तर धार्मिकता, जातीयता यांना बळ मिळेल अशीच कामाची रचना उभी केली.

हेही वाचा… New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात

इतकेच काय आता लोकसभा निवडणुकीत उभे असलेले सर्वच उमेदवार जातींचा पाठबळ मिळावे यासाठी खस्ता खाताना दिसत आहेत. काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना एका बैठकीत ६७ जातींनी पाठिंबा दर्शविला. शिवाय,शाहू महाराज मागासवर्गीय वस्ती, धनगर वाड्यांमध्ये गेल्यानंतर आपलेपणाने कसे वागत असतात याचेही सचित्र वृत्त दिले जाते. मोदी, विकास, हिंदुत्वाचा विचार एकीकडे मांडत असताना खासदार संजय मंडलिक हे वडील सदाशिव मंडलिक यांच्या पुरोगामी त्याचे दाखले देत आहेत. याच वेळी विविध जातींचा पाठिंबा मिळावा यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

हातकणंगले मतदारसंघातही याहून वेगळे चित्र नाही. येथे तर सारेच उमेदवार जाती – धर्माचा पाठिंबा मिळावा यासाठी दरेक दिवशी क्रमाक्रमाने फिरताना दिसत आहेत. खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी तळ ठोकताना विविध जाती, धर्माच्या प्रमुखांची भेट घेऊन संपर्क वाढवला आहे. ठाकरे सेनेचे सत्यजित पाटील सरुडकर यांनी विविध जाती, धर्मांच्या मंदिर, कार्यालयामध्ये जाऊन पाठबळ मिळवण्याची शर्त चालवली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही अशाच पद्धतीचे प्रयत्न चालवलेले आहेत. एकूणच कोल्हापूरला पुरोगामी म्हटले आणि उमेदवारही स्वतःचे पुरोगामीत्व प्रसिद्धीच्या झोतात कसे येईल याची काळजी घेत असले तरी दुसऱ्या बाजूला जाती – धर्माच्या माध्यमातून मतांचा जोगवा मागताना फिरत असल्याचे ठळकपणे दिसत आहे.

हेही वाचा… तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार

समाजांतर्गत वाद

उमेदवारांनी समाजाचे कार्यालय, मंदिरे येथे जाऊन समर्थन मिळाल्याचे वातावरण तापवले जात आहे. त्यावरून समाज- समाजात वादाच्या ठिणग्या उडत आहेत. ज्यांना उमेदवारांना पाठिंबा द्यायचा आहे तो अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी स्वतःचा असल्याचे घोषित करावा. अवघ्या समाजाचे, जातीचे अधिकारपत्र घेऊन मिरवू नये, असे वादाचे मुद्दे अन्य उमेदवाराला पाठबळ असलेल्या समाजांतर्गत गटाकडून मांडले जात आहे. त्यावरून समाजामध्येच वादाचे मोहळ उठले असून त्याचे निवारण करणे हि समाज धुरिणांची कर्मकठीण परीक्षाच बनली आहे.