कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोनदा मैदान मारले. यामुळे या मतदारसंघाची भूमी शेतकरी चळवळीतील नेत्यांना अनुकूल असल्याचा निष्कर्ष काढीत यावेळी लोकसभा निवडणुकीचा फड मारण्याच्या उद्देशाने शेतकरी नेत्यांची एकच भाऊगर्दी झाली आहे. स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, किसान नवजवान या नव्या संघटनेचे उमेदवार शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आणि जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक शिवाजी माने यांनी लोकसभा निवणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

हातकणंगलेत पूर्वीपासून प्रामुख्याने काँग्रेस- राष्ट्र्रवादीचे प्रभुत्व राहिले आहे. त्याला प्रथम शह दिला तो राजू शेट्टी यांनी. २००९ सालच्या निवडणुकीत या शेतकरी नेत्याने सहकार सम्राटांच्या या मतदारसंघात शेतकरी चळवळीलाही यश मिळते हे दाखवून दिले. पुढच्याही निवडणुकीत त्यांनी विजयाची पुनरावृत्ती केली. हातकणंगले मतदारसंघातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेतील तमाम नेत्यांची जडणघडण शरद जोशी यांच्या मुशीत झाली. जोशी यांच्याशी पटले नसल्याने शेट्टी यांनी स्वतःची स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन करून शिवार ते संसद हा प्रवास दोन वेळा करून दाखवला. आता तिसऱ्यांदा त्यांना संसद खुणावत आहे.

हेही वाचा : धुळ्यात काँग्रेस उमेदवाराच्या शोधात

केवळ शेट्टी यांनाच नव्हे हा लोकसभा मतदारसंघ शेतकरी नेत्यांना, चळवळीला बळ देणारा असल्याचा निष्कर्ष शेतकरी नेत्यांनी काढला आहे. त्यामुळे एकाहून एक नेते या मतदारसंघाच्या फडात उडी घेताना दिसत आहेत. शेट्टी यांच्या पाठोपाठ सर्वाधिक लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव रघुनाथदादा पाटील यांना आहे. त्यांनी यापूर्वी शिवसेना, आम आदमी पार्टी यांच्याकडून निवडणूक लढवली आहे. यावेळी ते किसान नवजवान या नव्या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीत उतरले असून प्रचाराला सुरुवात केली आहे. या मतदारसंघातील दोन तालुके हे सांगली जिल्ह्यातील आहेत. तेथील या भागात पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याच भागातील रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे. शिवसेनेने खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी खोत यांची नाराजी दूर झालेली नाही. ढोल वाजवायला आम्ही जन्माला आलो नाही. आम्ही प्रस्थापितांचे गुलाम नाही. विस्थापितांच्या लढाईत प्रत्येक वेळी प्रस्थापित आमच्या मानगुटीवर बसतो, अशा शब्दात त्यांनी नाराजीला तोंड फोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खोत यांनी उमेदवारी बदलून ती आपल्याला देण्याची मागणी सुरू ठेवली आहे.

हेही वाचा : सांगलीत शिवसेना – काँग्रेस दोघांचीही घालमेल

कालचे सहकारी आजचे शत्रू

हातकणंगले तालुक्यात जय शिवराय शेतकरी संघटना सक्रिय आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी माने यांनी मेळावा घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली आहे. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार, बळीराजा पक्षासह डझनभर संघटनांनी त्यांच्या प्रचार सभेला हजेरी लावून पाठिंबा दिला आहे. संघटनेच्या ३०० शाखा असून त्याच्या जोरावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे माने यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे एकेकाळी रघुनाथ पाटील, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, शिवाजी माने हे एकाच शेतकरी चळवळीचे जिवाभावाचे सहकारी होते. लोकसभा निवडणुकीत दुरावलेले नेते एकमेकांची जिरवण्यासाठी फडात उतरले आहे हि गोड उस दरासाठी प्राणपणाने लढणाऱ्या शेतकरी नेत्यांची कडू कहाणी म्हणायची.