हर्षद कशाळकर जिल्ह्याचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे, पालकमंत्रीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मात्र तरीही रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष मिळू शकलेला नाही. गेली दोन महिने प्रभारी जिल्हाध्यक्षावर पक्षाचा कार्यभार देण्याची वेळ पक्षनेतृत्वावर आली आहे. नाराज असलेल्या माजी आमदार सुरेश लाड यांची मनधरणी करण्यात तटकरे यशस्वी झाले असले तरी लाडांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी प्रदेश कार्यालयालाही पसंत पडेल असा उत्तराधिकारी शोधण्यात सुनील तटकरे यांना यश आलेले नाही. काय घडले-बिघडले? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा एप्रिल महिन्यात पार पडली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सातही मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचा सल्लाही दिला. ही परिवार संवाद यात्रा कर्जत येथे असतानाच सुरेश लाड यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून दिला. या राजीनाम्यानंतर ते बरेच दिवस अज्ञातवासात होते. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा बरेच दिवस सुरू होती. ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. लाड यांना महामंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणीही कर्जत मधील कार्यकर्त्यांनी केली होती. या नाराजी नाट्यादरम्यान अखेर प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत तटकरे यांनी महामंडळावरील नियुक्त्या होतील त्यात पहिले नाव सुरेश लाड यांचे असेल असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही लाड हे बरेच दिवस पक्ष कार्यापासून अलिप्त होते. अखेर सुनील तटकरे यांनी लाड यांची घरी जाऊन भेट घेतली आणि मनधरणी केली. या मनधरणीनंतर अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणीची बैठक पार पडली. नाराजीनाट्यानंतर या बैठकीला सुरेश लाड हे उपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत वादळाच्या एका अंकावर पडदा पडला. या बैठकीनंतर लाड यांची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषद घेऊन लाड यांनी आपण पक्षातच राहणार असल्याचे जाहीर केले. कोंढाणे धरणाचे पाणी स्थानिकांना मिळावे यासाठी आपण राजीनामा दिल्याचे कारण त्यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. धरणाच्या पाण्यावर स्थानिकांनाही अधिकार देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली जाईल, असे सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगून टाकले. मात्र याचवेळी माजी आमदार सुरेश लाड यांनी दिलेला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारला असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केले. रोह्याच्या मधुकर पाटील यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला. वास्तविक पाहता जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत लाड यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्षाची निवड होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. इथेच पक्षांतर्गत नाराजीचा दुसरा अंक सुरू झाला. सुरेश लाड यांच्या नाराजीनाम्यामुळे रिक्त झालेले जिल्हाध्यक्षाचे पद अजूनही भरले गेलेले नाही. गेली दोन महिने पक्षाकडे पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष उपलब्ध नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. लाड यांच्या राजीनाम्यानंतर दत्ताजीराव मसूरकर, सुधाकर घारे अशोक भोपतराव, नरेश पाटील हे दुसऱ्या फळीतील नेते जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. तर अनिकेत तटकरे आणि मधुकर पाटील यांची नावेही जिल्हाध्यक्षपदासाठी घेतली जात आहे. जिल्ह्यातील सत्ता आणि राजकारणाचे केंद्र तटकरे कुटुंबापुरते मर्यादित झाले आहे. त्यामुळे तटकरे यांची मर्जी कोणावर होणार याची उत्सुकता आहे. संभाव्य राजकीय परिणाम रायगड जिल्ह्यात कर्जत आणि श्रीवर्धन या दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. महाविकास आधाडीच्या स्थापनेनंतर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मोठी कोंडी झाली आहे. कारण शिवसेना हा राष्ट्रवादीचा मतदारसंघातील प्रमुख प्रतिस्पर्धी राहिला आहे. आता ज्या शिवसेनेविरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने दोन हात केले त्यांच्याशी जुळवून घेण्याचा सल्ला पक्षाकडून दिला जात आहे. हेच लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अस्वस्थतेचे मूळ कारण आहे. भविष्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी कायम राहिली तर त्याचा मोठा फटका मतदारसंघातील संघटनेवर होणार आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासह महामंडळाचे अध्यक्षपद मतदारसंघात असावे यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. तसे न झाल्यास आगामी काळात त्याचे राजकीय फटके या मतदारसंघात बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.