सांगली: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने जिल्हाध्यक्षांची खांदेपालट करत ग्रामीणचे अध्यक्षपद वाळव्यातील महाडिक गटाकडे तर शहराचे अध्यक्षपद कुपवाडला दिले आहे.
ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक हे वाळव्यातील असले तरी त्यांनी गेल्या दहा वर्षात शिराळ्यातही राजकीय बस्तान बसविले आहे. तर प्रकाश ढंग यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्ष पद सोपवत असताना जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. महापालिका, जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे, जनसुराज्य, रयत क्रांती संघटना यांच्याशी कसा समन्वय राखला जातो यावर महायुतीचे यशापयश अवलंबून आहे. मात्र, जिल्हाध्यक्ष नियुक्ती करण्यापुर्वी पक्ष निरीक्षकांनी कार्यकारणीतील सदस्यांनी मते जाणून घेत असताना जी नावे जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होती, ती नावे बाजूलाच राहिल्याने निर्माण झालेली वरिष्ठ नेतृत्वातील नाराजी कशी दूर होणार यावर पक्षाची राजकीय मांडणी अवलंबून राहणार आहे.
शिराळा विधानसभा मतदार संघात उमेदवारीसाठी महाडिक यांचा प्रबळ दावा होता. किंबहुना विधानसभेच्या उमेदवारीच्या भरवश्यावरच लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे खा. धैर्यशील माने यांना मदत करण्यात आली होती. मात्र, पक्षाने सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देउन आमदार होण्याची वाट सुकर केली. यावेळी महाडिक यांची समजूत काढत असताना त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द पक्षाकडून देण्यात आला होता. या शब्दावर विश्वास ठेवून वाळवा तालुक्यातील ४८ गावात अधिकाधिक मतदान महायुतीला म्हणजेच भाजपला देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या शिराळ्यात मानसिंगराव नाईक यांचा पराभव केला. या बदल्यात महाडिक यांचा आमदारकीवरच दावा अधिक प्रबळ ठरला होता. मात्र भाजपने त्यांना आमदारकी ऐवजी जिल्हाध्यक्ष पदावर बोळवण केली. म्हणजेच दूधाची तहान ताकावर भागविण्याचाच हा प्रकार म्हटला पाहिजे.
शिराळा विधानसभा मतदार संघावर वाळवा तालुक्यातील ४८ गावे असल्याने ही मते निर्णायक ठरतात. तालुक्याचे राजकारण देशमुख- नाईक या दोन गटाभोवतीच आतापर्यंत सीमीत होते. मात्र गेल्या दहा वर्षात हे चित्र बदलले आहे. दोन्ही नाईकामध्ये एकी झाल्याने शिराळा एकतर्फी होते की अशी स्थिती असताना विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. यानंतर गेल्या तीन चार महिन्यात राजकीय स्थिती झपाट्याने बदलत असून माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनीही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला रामराम करत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच जतमध्ये विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे, आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख, या चार माजी आमदारांचा अजितदादा गटात झालेला प्रवेश भाजपसाठी अडचणीचा ठरतो, की मदतीचा हेही महत्वाचे ठरणार आहे. जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करण्यासाठी महायुतीमध्येच आता चढाओढ लागणार आहे. भाजप मोठा भाऊ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत पुढे येतो की सवता सुभा मांडून पुढे येतो यावर महाडिक यांचे जिल्हाध्यक्ष पदाचे यशापयश अवंलबून राहणार आहे.
कुपवाडचे प्रकाश ढंग यांच्याकडे पुन्हा एकदा शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जशी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस होती, तशीच चुरस शहर जिल्हाध्यक्ष पदाची होती. मात्र, जातीय समतोल साधण्यासाठी ढंग यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्यांना प्रदेश पातळीचे पद देउन बोळवण केली जाउ शकते. महापालिका निवडणुकीत स्थानिक पदाधिकार्यांच्या मताला कितपत महत्व असते हे जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून स्पष्ट झाले आहेच, केवळ नामधारी म्हणून पद वाटप केले जात असेल तर त्या पदाला महत्व कितपत हाही प्रश्न यामुळे निर्माण होतो. आता भाजपमध्ये निवड ऐवजी नियुक्तीचा पायंडा पडल्याने पक्षाची झपाट्याने काँग्रेसीकरण होउ घातले आहेे की काय अशी रास्त शंका या निमित्ताने उपस्थित केली जात आहे.