Indira Gandhi Was Shot a Reporters Diary : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून करण्यात आलेली हत्या ही स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात दुःखद आणि हिंसक घटनांपैकी एक मानली जाते. संपूर्ण देशवासीयांचे काळीज धस्स करणाऱ्या या घटनेला जवळपास चार दशकांचा कालावधी लोटला आहे. आता एका आत्मचरित्रात माजी पंतप्रधानांच्या हत्येविषयी काही नवीन खुलासे करण्यात आले आहेत. दरम्यान, द इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यकारी संपादक रितू सरिन यांनी याविषयी सविस्तर लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलंय? ते जाणून घेऊ…

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी डॉ. स्नेह भार्गव यांची अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (AIIMS) संचालकपदी नियुक्ती झाली. याच दिवशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांचेच सुरक्षारक्षक सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी बंदुकीने गोळ्या झाडल्या. आता ९५ वर्षीय डॉ. भार्गव यांनी त्यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘The Woman Who Ran AIIMS’ या आत्मचरित्रात त्या दिवशी घडलेल्या भयानक घटनेचे तपशीलवार वर्णन केले आहे.

डॉ. स्नेह भार्गव यांनी आत्मचरित्रात काय लिहिलंय?

आपल्या आत्मचरित्रात डॉ. भार्गव म्हणतात, “माझ्या नियुक्तीपत्रावरील शाईही वाळलेली नव्हती, त्याचवेळी एम्स रुग्णालयातील आठव्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागामध्ये शल्यचिकित्सकांचे एक सैरभैर पथक पंतप्रधानांचे प्राण वाचविण्यासाठी हरलेली लढाई लढत होते. जवळजवळ चार तास त्यांनी एक नाट्यमय प्रयत्न सुरू ठेवला. जणू काही इंदिरा गांधी यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत असं ते दाखवत होते.”

आणखी वाचा : माजी केंद्रीय मंत्र्याच्या हत्येची ५० वर्षानंतर पुन्हा होणार चौकशी? कोण होते ललित नारायण मिश्रा?

रितू सरिन लिहितात, “त्या दुर्दैवी सकाळचं गडद सावट, एम्सच्या आठव्या मजल्यावर रांग लावून उभे असलेले देशातील काही प्रभावशाली व्यक्ती, त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारा कुजबुजत्या हंबरड्यांचा आवाज, हे चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर खिळतं, कारण त्यावेळी मी तिथेच उपस्थित होते. मला आठवतंय की, मी दिल्ली रेकॉर्डर या मासिकाच्या नेहरू प्लेस ऑफिसमधील पीटीआयच्या टेलिप्रिंटरकडे धावत गेले, जिथे मी त्यावेळी प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम करीत होते. पंतप्रधान इंदिरा गांधींना गोळ्या लागल्याच्या बातम्या मी अविश्वासाने वाचत होते.”

रितू सरिन आपल्या लेखामध्ये काय म्हणतात?

रितू सरिन पुढे त्यांच्या लेखामध्ये लिहितात, “त्यावेळी मी एका दुसऱ्या प्रशिक्षणार्थी पत्रकाराशी वाद घातला, कारण तो मला ऑफिसमध्येच थांबून ही बातमी कव्हर करण्याचं म्हणत होता. त्याचं काहीही न ऐकता मी एम्सच्या दिशेने निघाले. योगायोगाने काही मोजक्याच पत्रकारांमध्ये मीही एम्सची सुरक्षा भेदून आठव्या मजल्यावर पोहोचले आणि तिथेच ठाण मांडून राहिले. सायंकाळी जेव्हा मी एम्समधून बाहेर पडले तेव्हा रुग्णालयाच्या परिसरात दंगली उसळल्या होत्या. जवळच असलेले टॅक्सी स्टँड जाळण्यात आले होते. जणू काही सूडाचा खेळ सुरू झाला होता.”

इंदिरा गांधी यांच्या हत्याप्रकरणाचे वार्तांकन

“पुढील अनेक वर्षांपर्यंत मी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणातील वार्तांकन केले. ‘Sunday’ या मासिकासाठी काम सुरू केल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणावर अनेक मुखपृष्ठ कथा लिहिल्या. पंतप्रधानांच्या हत्येनंतर काही मिनिटांतच त्यांची हत्या करणाऱ्या बेअंत सिंग या आरोपीला ठार मारण्यात आले. दुसरा आरोपी सतवंत सिंग याला पोलिसांनी कसबसं वाचवलं आणि तो जिवंत राहिला; पण माध्यमांसमोरची एक मोठी अडचण अशी होती की, त्याचा एकही फोटो माध्यमांकडे उपलब्ध नव्हता. मला हा फोटो मिळविण्याचं भाग्य मिळालं”, असं रितू सरिन यांनी त्यांच्या लेखात लिहिलं आहे.

इंदिरा गांधींच्या आरोपींचा फोटो कसा मिळवला?

रितू सरिन म्हणतात, “काही दिवसांनी सतवंत सिंगचे वडील त्रिलोचन सिंग यांनी त्यांच्या मुलाच्या वकिलांना भेट देण्यासाठी दिल्लीवाऱ्या सुरू केल्या. एकदा त्यांनी असं सांगितलं की, सतवंत सिंग जेव्हा दिल्ली पोलिसात भरती झाला, तेव्हा त्याने कुतुब मिनारजवळ असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढला होता. त्रिलोचन सिंग हे गावी परतल्यानंतर त्यांनी मला त्या फोटोचा संदर्भ क्रमांकही दिला. मी तो स्टुडिओ शोधून काढला आणि स्टुडिओ मालकाला तो क्रमांक दिला. अशा पद्धतीने मला सतवंत सिंगचे पासपोर्ट साईज फोटो मिळाले.”

रितू सरिन लिहितात, “१९९० पर्यंत मी या प्रकरणावर ‘The Assassination of Indira Gandhi’ हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणातही ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी एम्समध्ये घडलेल्या त्या दुर्दैवी नाट्याचं संपूर्ण तपशीलवार वर्णन आणि इंदिरा गांधी यांच्यावर झालेल्या क्रूर गोळीबाराचं वर्णन करण्यात आलं आहे.”

“इंदिरा गांधींची नाडीही चालत नव्हती”

एम्स रुग्णालयाच्या तत्कालीन संचालक डॉ. स्नेह भार्गव आपल्या पुस्तकात लिहितात, “पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जेव्हा एम्समध्ये आणलं, तेव्हा त्यांची नाडीही चालत नव्हती. तरीही हृदय-फुफ्फुस यंत्राद्वारे (cardiopulmonary bypass machine) त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. त्यावेळी हे यंत्र चालविणारा तरुण हा देखील शीखच होता. ज्या क्षणी त्याने डॉक्टरांच्या तोंडून ऐकलं की, पंतप्रधानांवर गोळ्या झाडणारे आरोपी हे शीख होते, तेव्हा त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ऑपरेशन थिएटरमधून पळ काढला, त्यामुळे नाईलाजाने डॉक्टरांना दुसऱ्या व्यक्तीला बोलवावं लागलं.”

हेही वाचा : Operation Sindoor : पाकिस्तानची साथ देणाऱ्या देशाने कसा सूर बदलला? शशी थरूर यांनी काय सांगितलं?

“शीख समुदायावर हल्ला होण्याची भीती”

डॉ. भार्गव पुढे लिहितात, “खरंतर त्या काळ्याकुट्ट सकाळी एम्सच्या आठव्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरमध्येही शीख समुदायावर हल्ला होईल अशी भीती निर्माण झाली होती, कारण प्रचंड लोकांची गर्दी इंदिरा गांधी यांचं दर्शन घेण्यासाठी एम्सच्या गेटसमोर उभी होती. शीख समुदायांविरोधात रक्तपात होईल ही शक्यता नाकारता येत नव्हती. दुर्दैवाने, पुढील काही दिवसांत ती शक्यता खरी ठरली…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीव गांधी यांना कोणती शंका होती?

इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा उलगडा म्हणजे, राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी डॉ. स्नेह भार्गव यांना सांगितले की, त्यांनी आपल्या आईला त्यांच्या शीख सुरक्षा रक्षकांपैकी एकाबद्दल इशारा दिला होता. इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक सुरक्षारक्षक राजीव यांना संशयास्पद वाटत होता. मात्र, त्यांनी बेअंत सिंग याचा उल्लेख केला होता की सतवंत सिंग याची स्पष्टता नव्हती.