इंडिया आघाडीनंतर आता एनडीएतही जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याचे दिसून येत आहे. बिहारमधील जागावाटपावरून एनडीएतील दोन मित्रपक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. एवढेच नाही, तर हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीच्या संपर्कात असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

खरे तर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने नुकताच बिहारमधील जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला आहे. त्यानुसार बिहारमध्ये भाजपाला १७, जेडीयूला १६, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला पाच, तर जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पशुपतीनाथ पारस यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाला एकही जागा न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा – “भाजपा म्हणजे भला मोठ्ठा डायनासोर, शेपटीला लागलेलं मेंदूपर्यंत पोहोचायला वेळ लागतो”; महिला मोर्चाच्या माजी उपाध्यक्षांची टीका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागावाटपावरून उपेंद्र कुशवाह आणि पशुपतीनाथ पारस हे दोन्ही नेते नाराज आहेत. उपेंद्र कुशवाह यांनी दोन जागांची मागणी केली होती; मात्र त्यांना एकच जागा देण्यात आली आहे. त्यामुळे ते नाराज असून, इंडिया आघाडीत सहभागी होतील, असे सांगितले जात आहे. त्याशिवाय चिराग पासवान यांचे काका पशुपतीनाथ पारस यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाला एकही जागा न दिल्याने तेदेखील नाराज असल्याची चर्चा आहे.

पशुपतीनाथ पारस यांनी २०२२ साली लोक जनशक्ती पक्षातून बाहेर पडत स्वत:चा वेगळा गट स्थापन केला होता. पारस हे सध्या हाजीपूरमधून विद्यमान खासदार आहेत. मात्र, भाजपाने पारस यांच्यापेक्षा चिराग पासवान यांना प्राधान्य दिले आहे. त्यावरूनही विविध चर्चांना उधाण आले आहे. या संदर्भात बोलताना भाजपाचे नेते म्हणाले, “आम्ही २०१९ च्या सूत्राप्रमाणेच जागावाटपाचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यावेळी एनडीएत तीन मित्रपक्ष होते आणि आता पाच मित्रपक्ष आहेत. त्यामुळे जागावाटपावरून थोडीफार नाराजी असणे स्वाभाविक आहे.”

पारस यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत एनडीएत प्रवेश केला, तर हाजीपूरच्या जागेवर काका पुतणे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. हाजीपूर एलजीपीचा गड मानला जातो. रामविलास पासवान यांनी नऊ वेळा हाजीपूरचे प्रतिनिधित्व केले होते.

जागावाटपाबाबतची घोषणा करताना एनडीएतील पक्षांनी ४८ तासांत याबाबतचा निर्णय घेतल्याचे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी सांगितले. २०१९ च्या निवडणुकीत एनडीएने ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. यावेळी पूर्ण ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचेही तावडे म्हणाले. २०१९ मध्ये भाजपा, जेडीयू व एलजीपीला मिळून राज्यातील एकूण ५३ टक्के मते मिळाली होती.

हेही वाचा – Loksabha Election 2024 : आयारामांना संधी दिल्यामुळे सपात नाराजीनाट्य; पक्षांतर्गत असंतोष वाढणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा बिहारमध्ये पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, औरंगाबाद, मधुबनी, अररिया, दरभंगा, सारण, उजियारपूर, बेगुसराय, नवादा, पाटणा साहेब, पाटलीपुत्र, आरा, बक्सर व सासाराम या जागा लढविण्याची शक्यता आहे. तर जेडीयू वाल्मीकी नगर, सीतामढी, जंझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, जेहानाबाद व शेओहर या मतदारसंघांतून निवडणूक लढविणार असल्याची माहिती आहे. त्याशिवाय एलजेपी (रामविलास गट) वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर, खगरिया व जमुई या जागा लढविणार असल्याचे सांगितले जात आहे.