नगरः अवघ्या सहा महिन्यांपूर्वी नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे डॉ. सुजय विखे यांच्या विरोधी उमेदवार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आज मात्र विखेविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नीलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे. लंके निमित्तमात्र आहेत. खरी लढत आहे ती राधाकृष्ण विखे विरुद्ध शरद पवार, राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये. विखे यांच्या विरोधात नेहमीप्रमाणे पवार-थोरात एकत्र आहेत. गेल्या चार निवडणुकांत या मतदारसंघात भाजपने सलग विजय मिळवला. ही परंपरा कायम राहणार की बदल होणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

नगर मतदारसंघ समस्यांनी प्रचंड ग्रासलेला, दुष्काळी. रोजगार, सिंचन, रस्ते, आरोग्य अशा मुलभुत प्रश्नांनी व्यापलेला. प्रत्यक्ष निवडणूक लढणारे आणि ती पडद्याआडून खेळणारे सारेच कधीना कधी सत्ताधारी होते. परंतु निवडणूक प्रचारातून या प्रश्नांची चर्चा होताना दिसत नाही. गतकाळाचे संदर्भ देत एकमेकांची उणीदुणी काढणे, समाजमाध्यमाचा आधार घेत हिणवणे, समर्थकाकडून गोळ्या घालण्याची भाषा वापरणे, प्रचारफेरीतील कार्यकर्त्यांकडून मारहाण होणे अशा पातळीवर निवडणूक प्रचारची पातळी खालावली आहे.

हेही वाचा : ५,७०५ कोटींची संपत्ती, ब्रँडेड गाड्या अन् बरंच काही! कोण आहेत लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार?

वंचित बहुजन आघाडीचा तिसरा उमेदवार फारसा प्रभावी ठरणार नसल्याने विखे-लंके अशीच थेट लढत आहे. शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांनी विखे पितापुत्रांविरोधात गौप्यस्फोट करत खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे हे अस्त्र विखे यांनी परतवून लावले. पक्षातील आणि पक्षाबाहेरील नाराजांची मोट बांधण्यासाठी विखे यांना बरेच प्रयत्न करावे लागले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. बाळासाहेब थोरात यांनी त्यांची शिर्डी मतदारसंघातील यंत्रणाही विखे विरोधात नगर मतदारसंघात उतरवली आहे. समाजमाध्यमांचा आधार घेत नीलेश लंके यांनी हवा निर्माण केली खरी, ती मतात परावर्तित करण्याचे कसब त्यांना दाखवावे लागणार आहे.

नगर मतदारसंघात महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट), महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट यांच्याकडे नेता नाही. महायुतीकडे तीन आमदार (दोन भाजप, एक अजितदादा गट) तर शरद पवार गटाकडे दोन आमदार आहेत. त्यातील एक रोहित पवार यांना मतदारसंघाऐवजी राज्य पातळीवर अधिक स्वारस्य आहे. मतदारसंघात विखे यांच्याकडे भाजपशिवाय स्वतःची यंत्रणा आहे. लंके यांना घटक पक्षांवर अवलंबून रहावे लागत आहे. शरद पवार व बाळासाहेब थोरात यांनी नगर मतदारसंघात लागोपाठ सभांचा धडाका लावला तर विखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या. मोदी यांच्या सभेला झालेली गर्दी लक्षणीय होती.

हेही वाचा : बसपा अध्यक्ष मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद नेमका कोण?

सुजय विखे यांच्या कार्यपध्दतीने निर्माण झालेली नाराजी आपल्याकडे वळवण्याचा नीलेश लंके यांचा प्रयत्न राहीला आहे तर सुपा औद्योगिक क्षेत्रातील अशांततेला विखे यांच्याकडून लंके व समर्थकांना जबाबदार धरले जात आहे. नगर व श्रीगोंदा येथील औद्योगिक जमीनींचा प्रश्न मार्गी लावून विखे यांनी मलमपट्टीचा प्रयत्न केला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे व माजीमंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही आपापल्या पक्षांचे स्टार प्रचारक. मात्र निकराच्या लढाईत दोघे मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

नामांतराचे श्रेय

राज्यात ज्या मतदारसंघात धनगर समाजाची मते प्रभावी आहेत, त्यात नगरचा समावेश होतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ही मते खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असाच उल्लेख आवर्जून केला जातो आहे. भाजपकडून नामांतराचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे तर विरोधकांकडून आरक्षणाचे अपश्रेय देण्याचा प्रयत्न होत आहे. याशिवाय मतदारसंघात ‘माधव’ समूह सक्रिय आहे. त्याने यापूर्वी भाजपची पाठराखण केली. दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे आहेत. याशिवाय कांदा व दूध उत्पादकांच्या नाराजीचा प्रश्नही मतदारसंघात जाणवत आहे.

हेही वाचा : यंदा काँग्रेस लढवतेय सर्वात कमी जागा; ‘इतक्या’ जागा दिल्या मित्र पक्षांना

अनेक वर्षांचे रखडलेले प्रकल्प

पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी पारनेरला मिळावे, साकळाई प्रकल्प, कुकडी प्रकल्पाचे सर्वाधिक लाभक्षेत्र नगर जिल्ह्यात असूनही पुणे जिल्ह्याकडून होणारा अन्याय, मुळा धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही नगर शहराला दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे, नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग, ताजनापूर टप्पा-२ प्रकल्प, रोजगारासाठी होणारे तरुणांचे स्थलांतर असे अनेक प्रश्न मतदारसंघात वर्षानुवर्षे खोळंबलेले आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांतून त्यावर वेळोवेळी आश्वासने दिली गेली मात्र, प्रश्न ‘जैसे थे’ आहेत.