इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विकासकामे करताना राजकीय अडथळे येत असल्याने माजी मंत्री प्रकाश आवाडे त्रस्त झाल्याचे दिसतात. एकीकडे प्रशासकीय पातळीवर सहकार्य मिळत नाही. दुसरीकडे विरोधकांचे डावपेच सुरू आहेत अशा दुहेरी कोंडीत ते अडकले आहेत. लोकसभा निवडणुकीआधी तर आवाडे यांनी अदृश्य राजकीय शक्ती आडवी येत असल्याचे उघडपणे सांगितले होते. तेव्हा त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करून विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. निवडणूक संपली. शिंदेसेनेचा विजय झाला. आता तरी त्या शक्तीचा उपद्रव संपला का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता आमदार आवाडे यांनी राजकीय शक्ती कार्यरत झाली आहे, अशी संदिग्ध टिपणी केली. म्हणजे त्यांना आड येणारे आता मदत करीत आहेत का, की त्याहून अधिक काही घडत आहे याची नेमकी उकल करण्यात मतदारसंघातील नागरिक गुंतले आहेत.

हिशेब चुकता करण्यासाठीच..

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वानाच विधानसभेचे वेध लागले आहेत. संभाव्य मंत्रीमंडळ विस्तारापेक्षा आमदारकीचे तिकीट कसे मिळेल याचीच मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यात लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता असली स्थानिक पातळीवर इच्छुकांची मांदियाळी पाहता अपक्षांचा राबताही मोठा असणार आणि या अपक्षांना पाठबळ विरोधकांमधून मिळाले तर निश्चितच कार्यभाग साधता येऊ शकतो याची प्रचीती नुकत्याच झालेल्या  लोकसभा निकालाने दाखवून दिली आहे. आता निवडून आणण्यापेक्षा पराभूत करण्यासाठीचा कार्यक्रम ताकदीने होणार असे वाटत आहे. हिशेब चुकता करण्यासाठी पुढच्या मुहूर्तापेक्षा विधानसभेचा

मुहूर्त साधण्याची संधी कोण चुकविणार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(सहभाग : दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे)